मानखुर्द रेल्वे फाटकातून सर्रास जीवघेणा प्रवास
शॉर्टकटच्या मोहात नागरिकांचा जीव धोक्यात
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः हार्बर मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात लल्लूभाई कंपाउंड व महाराष्ट्र नगरकडे जाण्यासाठी अनेक प्रवासी सर्रासपणे रेल्वेरूळ ओलांडत असल्याचे चित्र आहे. सुरक्षित मार्ग उपलब्ध असतानाही या शॉर्टकट मार्गाच्या वापरामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
मानखुर्द हे हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक मानले जाते. पनवेल द्रुतगती मार्ग, प्रस्तावित मेट्रो स्थानक आणि विविध शासकीय तसेच औद्योगिक संस्थांमुळे या परिसराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. बीएआरसी, मंडाळा, ट्रॉम्बे, टाटा इन्स्टिट्यूट, अणुशक्ती नगर डेपो, कोळीवाडा, लल्लूभाई कंपाउंड, साठे नगर, पीएमजी नगर आणि महाराष्ट्र नगर या भागात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, लाल्लूभाई कंपाउंड आणि महाराष्ट्र नगरकडे जाण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा मारावा लागत असल्याने अनेक जण थेट रेल्वेरूळ ओलांडून जाण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारत आहेत.
काही ठिकाणी संरक्षक जाळी गायब व भिंती तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिक सहजपणे रुळांवर उतरतात. सकाळी आमि संध्याकाळच्या गर्दीच्या काळात ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
वेगाने धावणाऱ्या लोकल गाड्यांमुळे यापूर्वीही अपघाताच्या घटना कित्येकदा घडल्या आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल रेल्वे रेल्वे प्रवासी सुरक्षा सेवा संघाचे अध्यक्ष संतोष धोत्रे यांनी उपस्थित केला आहे. नाल्याजवळ तुटलेल्या संरक्षक जाळी नवीन संरक्षण लावण्यात याव्यात तसेच नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काही स्थानकाजवळ संरक्षण जाळ्या नसल्याने प्रवासी बिनधास्त रूळ ओलांडताना दिसत आहे. रेल्वे प्रशासना याकडे लक्ष घलावे.
कपिल झोडगे,
सल्लागार, रेल्वे रेल्वे प्रवासी सुरक्षा सेवा संघ
या ठिकाणी शासनाने त्वरित लक्ष घालून पादचारी पूल बांधावा.
अभिमान जगताप, सामाजिक कार्यकर्ते.