डोंबिवली, ता. १२ : ग्रामीण भागातील तापमानाने ४३ अंशांचा टप्पा गाठला असताना मलंगगड परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळित झाले आहे. घरगुती कामांबरोबरच शेती, लघुउद्योग, दुकाने आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मलंगगड परिसरासह आसपासच्या ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होणे, अचानक वीज जाणे; तसेच तासन् तास वीजपुरवठा बंद राहणे, अशा समस्या सातत्याने उद्भवत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही या समस्येचा मोठा फटका बसत असून विजेअभावी पाणीपुरवठ्याच्या मोटारी बंद पडत असल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क प्रमुख तथा नगरसेवक महेश गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांसह महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन सादर करत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवून भविष्यात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, वीजपुरवठ्याची समस्या तातडीने मार्गी लावली नाही, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.