सुकलेल्या झाडांमुळे घोर
तारापूर एमआयडीसीतील रस्त्यालगत धोका
बोईसर, ता. १४ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्ते गटारीच्या कामांमुळे अनेक झाडांची मुळे कमकुवत झाल्याने सुकलेली आहेत. मुख्य रस्त्यालगतच्या झाडांमुळे पावसाळ्यात मोठी दुर्घटनेची भीती आहे.
या मार्गावरून हजारो कामगार, वाहनचालक, नागरिक प्रवास करतात. जोरदार वारे किंवा मुसळधार पावसात ही झाडे कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने झाडांचा आधार धोक्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळा तोंडावर असताना एमआयडीसी प्रशासन व संबंधित विभागाने तातडीने धोकादायक झाडांची पाहणी करून छाटणी किंवा हटविण्याची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.