धारावीतील पायवाटांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
गल्लीबोळातून जाताना नागरिकांना त्रास
धारावी, ता. १४ (बातमीदार) : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा उल्लेख जिचा केला जातो, त्या धारावीचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, तोपर्यंत येथे नागरी सुविधा मिळाव्या म्हणून येथील नागरिक प्रयत्न करताना दिसत असून, सध्या येथील पायवाटा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरतानाचे चित्र आहे. मुळात येथील गल्ल्या अत्यंत अरुंद असून, एकावेळी एकच व्यक्ती येथून जाऊ शकते अशी येथील स्थिती असून, येथील अनेक पायवाटा नादुरुस्त असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
धारावीत असलेल्या अनेक विभागात असंख्य घरे आहेत. येथील अनेक ठिकाणी जाण्यासाठी स्थानिकांना विविध पायवाटांचा अवलंब करावा लागतो. येथील काही गल्ल्या विस्तिर्ण असून, काही गल्ल्या अरुंद आहेत. त्यामुळे दोन व्यक्ती समोरा समोर आले असता अडथळा निर्माण होतो. तसेच काही ठिकाणी उघडी गटारे व त्यावरील जलवाहिन्या चालताना नागरिकांसाठी अडचणी निर्माण करतात. ही अनेक वर्षांपासून सुरू असलेली येथील प्रथा केव्हा संपणार, अशी विचारणा येथील नागरिक करतात. येथील लहान मुलांना अनेकदा दुखापतही झाले असल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
लहान मुले, गरोदर माता, वृद्ध, दिव्यांग, रुग्ण यांना अशा नादुरुस्त पायवाटांवरून चालणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच असल्याचे स्थानिकांचे मत आहे. एखादी व्यक्ती अचानक आजारी पडल्यास त्या व्यक्तीला घरातून मुख्य रस्त्यावर नेण्यासाठी कसरत करावी लागते. पावसाळा तोंडावर आला आहे. धारावीतील अनेक भागात पावसाळ्यात पाणी तुंबते यामुळे पादचाऱ्यांना तुंबलेल्या पाण्यातून नादुरुस्त पायवाटेवरून चालताना अडचणीत भर पडणार आहे. यामुळे पालिकेसह लोकप्रतिनिधींनी तातडीने या गंभीर होत असलेल्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर खिल्लारे यांनी केली आहे.