एपीएमसीत जांभळांची आवक वाढली
भावात घसरण सुरू
वाशी, ता. १४ (बातमीदार) ः उन्हाळ्याच्या अखेरीस बाजारात दाखल होणाऱ्या जांभळांनी वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारात रंगत आणली आहे. कोकण आणि महाराष्ट्र-गोवा सीमेलगतच्या भागांतून जांभळांची आवक बाजारात वाढू लागल्याने भावही काहीसे कमी झाले आहेत. पुढील काही दिवसांत स्थानिक भागातील जांभळे बाजारात येऊ लागल्यानंतर भाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणपट्ट्यातील गावांमधून जांभळांचा पुरवठा एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुरुवारी) (ता. १५) बाजारात सुमारे २० क्विंटल जांभळांची आवक झाली. सध्या, दरदिवशी जांभळाच्या एक ते दोन गाड्या फळ बाजारात दाखल होत आहेत. येत्या १० ते १५ दिवसांत अंबरनाथ, बदलापूर, खोपोली आणि कर्जत परिसरातील जांभळे बाजारात येतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. मागील १०-१५ दिवसांपासून कमी-जास्त प्रमाणात जांभळे बाजारात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या भावातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसांत आवक वाढून भाव कमी होण्याची शक्यता आहे, असे फळ बाजारातील व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले.
हंगामी रोजगार
जांभळाच्या हंगामामुळे कोकण आणि डोंगराळ भागातील अनेक कुटुंबांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. जंगल परिसरातून जांभळांचे संकलन करून ते मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आणले जातात, काही ठिकाणी महिला बचत गटांकडून जांभळावर प्रक्रिया करून सरबत, जेंग आणि पावडर तयार करण्याचे कामही केले जाते. त्यामुळे जांभळाचा हंगाम हा केवळ फळ बाजारापुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही हातभार लावत आहे.
भावातील तुलना :
सध्याचा घाऊक भाव : २५० ते ३५० रु. प्रतिकिलो
एप्रिल अखेरचा भाव : ३०० ते ४०० रु. प्रतिकिलो
उच्च दर्जाची जांभळे : ४५० ते ५५० रु. प्रतिकिलो