चारोटी उड्डाणपुलावर पुन्हा अपघात
चांदीच्या विटा घेऊन जाणाऱ्या व्हॅनची ट्रेलरला धडक; दोघांचा मृत्यू
कासा, ता. १५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शुक्रवारी (ता. १५) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त व्हॅनमध्ये तब्बल १७ कोटी ७६ लाख रुपयांच्या चांदीच्या विटा आढळल्याने पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवत मुद्देमाल ताब्यात घेतला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिस कर्मचारी शुक्रवारी गस्त घालत असताना सकाळी ६.२५ वाजण्याच्या सुमारास गंभीर अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ब्रिंक्स इंडिया प्रायव्हेट कंपनीची ही व्हॅन मुंबईतील भायखळा येथील नाकोडा बुलियन कंपनीकडून चांदी घेऊन गुजरातमधील वापी जीआयडीसी परिसरातील मोदी सन लिमिटेड कंपनीकडे जात होती. गुजरातच्या दिशेने जात असलेल्या या व्हॅनचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजकावर व्हॅन आदळली. त्यानंतर समोरून गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरला व्हॅनची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत व्हॅनमधील सुरक्षा रक्षक एस. त्रिपाठी आणि कर्मचारी आकाश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक सुभाष निकम गंभीर जखमी असून त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, कासा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हरही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातग्रस्त वाहन हटविण्याची कार्यवाही करण्यात येत असताना काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती; मात्र पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
चांदीच्या २० विटा आढळल्या
अपघातग्रस्त व्हॅनमध्ये ६०० किलो वजनाच्या चांदीच्या २० विटा आढळून आल्या. या चांदीची अंदाजे किंमत १७ कोटी ७६ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमर पाटील यांनी तातडीने संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही केली. संबंधित कंपनीशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलवले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
प्राधिकरणावर तीव्र नाराजी
चारोटी उड्डाणपुलावरील धोकादायक वळणामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, ‘आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.