मुंबई

अंबरनाथ स्थानकावर भटक्या कुत्र्यांचे बस्तान

CD

अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : मध्य रेल्वेवरील अंबरनाथ रेल्वे स्थानक सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्थानकावर फलाट, प्रवेशद्वार, तिकीट खिडकी परिसर आणि पादचारी मार्गांवर कुत्र्यांची टोळकी मुक्तपणे फिरताना दिसत असून प्रवाशांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
अंबरनाथमधून दररोज हजारो चाकरमानी मुंबईच्या दिशेने रेल्वेने प्रवास करतात. याशिवाय प्राचीन शिवमंदिरामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांचीही ये-जा असते. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर अनेकदा कुत्री झोपलेली दिसतात, तर काही श्वान गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या मागे धावताना किंवा त्यांच्यावर भुंकतात. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. अचानक समोर येणाऱ्या किंवा भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे प्रवासी दचकतात, त्यामुळे अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळी आणि रात्री उशिरा रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे तसेच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजकरण आणि पुनर्वसनासाठी विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

खाद्यपदार्थांमुळे वावर वाढला
स्थानक परिसरातील खाद्यपदार्थांचा कचरा आणि उघड्यावर टाकले जाणारे अन्न हे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामागील प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही प्रवाशांच्या मते, प्राणीप्रेमींकडून स्थानक परिसरात बिस्कीट व इतर खाद्यपदार्थ टाकले जात असल्यानेही कुत्र्यांचे येथे कायम वास्तव्य वाढत आहे.

MUM26F43086

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT