मुरबाड, ता. २४ (बातमीदार) : कल्याण-मुरबाड-माळशेज घाटमार्गे अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती टोकावडे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी दिली आहे. माळशेज घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद असल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरविली होती. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पहिल्या पावसानंतर घाट परिसरातील दरडींमधून काही छोटे दगड रस्त्यावर पडले होते. त्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. माळशेज घाट मार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच कोणतीही माहिती अधिकृत स्रोतांकडूनच पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.