मुंबई

वसई विरार महापालिकेत नियंत्रण कक्ष कार्यान्वित

CD

विरार, ता. २४ (बातमीदार) : पावसाळ्यातील पूरस्थिती, इमारत दुर्घटना आणि अन्य नैसर्गिक आपत्तींना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी वसई-विरार महापालिकेने ‘एकत्रित आपत्ती नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित केला आहे. महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर उभारलेल्या या कक्षाचे उद्‍घाटन महापौर अजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आगामी काळात शहरातील सीसीटीव्ही जाळे आणि स्वयंचलित हवामान केंद्रे या नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे हवामानातील बदल आणि शहरातील विविध भागांतील परिस्थितीची माहिती त्वरित उपलब्ध होऊन मदतकार्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. अग्निशमन विभागातील १५ जवानांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ (एनडीआरएफ)मार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वसई-विरार शहरात वाढत्या नागरीकरणामुळे पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे तसेच जुन्या इमारतींच्या दुर्घटना घडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत विविध विभागांमध्ये त्वरित समन्वय साधून मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यापूर्वी विविध यंत्रणांचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष असल्याने माहितीची देवाणघेवाण आणि निर्णय प्रक्रियेत विलंब होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिका, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस आणि महसूल विभाग यांचे प्रतिनिधी या नियंत्रण कक्षात २४ तास तैनात असणार आहेत.

पावसाळा आणि नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोणत्याही संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत.
- पृथ्वीराज बी. पी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

आपत्कालीन परिस्थितीत माहिती मिळावी आणि त्यावर लगेच कार्यवाही करता यावी, यासाठी हा नियंत्रण कक्ष अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यरत राहील.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार महापालिका

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT