इंदिरानगर-बगाडे कंपनी परिसरात विद्युत गळतीचा संशय
भटक्या श्वानाचा जागीच मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : येथील इंदिरानगर-बगाडे कंपनी परिसरात पालिकेच्या हायमास्ट दिव्याच्या विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन विद्युत प्रवाह गळती झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पावसाच्या पाण्यात करंट उतरून एका भटक्या श्वानाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली असून, महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
इंदिरानगर-बगाडे कंपनी परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच पाण्यात एक भटका श्वान उतरला असता त्याला विजेचा धक्का बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत श्वानाचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मते, हायमास्ट दिव्याच्या विद्युत यंत्रणेमधून गळती होत असल्याने पावसाच्या पाण्यात करंट उतरला असावा. या घटनेची तातडीने तांत्रिक तपासणी करून नेमके कारण शोधण्याची मागणी करण्यात येत आहे. यामध्ये कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली तरी एखादा नागरिक त्या पाण्यात उतरला असता मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कठोर कारवाईची मागणी
शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा शहरप्रमुख महेश कोटीवाले यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाने घटनास्थळी तांत्रिक तपासणी करून हायमास्ट व विद्युत यंत्रणेतील दोष शोधावेत. संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी तसेच शहरातील सर्व हायमास्ट व विद्युत यंत्रणांचे सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी केली.