कल्पतरू प्रकल्पामुळे महामार्ग रुंदीकरणावर प्रश्नचिन्ह?
नागरिकांकडून चौकशीची मागणी
कर्जत, ता. २४ (बातमीदार) : नांगुर्ले-वरणे परिसरात भारत मुरबाड-कर्जत-खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ लगत सुरू असलेल्या कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पामुळे भविष्यातील महामार्ग रुंदीकरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकल्पाकडून महामार्गाच्या कडेला सेवा रस्त्यालगत संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे.
सध्या महामार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, प्रांत कार्यालय आणि भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी होणे बाकी आहे. भविष्यात रस्त्याची रुंदी वाढविण्याचा प्रस्ताव असल्याने महामार्गालगतच्या जागेचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या बांधकामामुळे भविष्यातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कल्पतरू प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रशांत पालांडे यांनी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी एमएसआरडीसीच्या सल्ल्याने संरक्षक भिंत उभारली जात असल्याचे स्पष्ट केले. तर एमएसआरडीसीचे अधिकारी रमेश माने यांनी काही अटींसह परवानगी देण्यात आली असून, भविष्यात आवश्यकता भासल्यास बांधकाम हटविले जाईल, असे सांगितले.
कोट
कर्जत-हालफाटा ५४८ अ महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेतील अडचणी आता दूर होत आहेत. शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळणार असून, मोजणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार या मार्गासाठी दोन्ही बाजूंना १५-१५ मीटर असे एकूण ३० मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे; परंतु मोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्पष्ट होईल. कल्पतरू व्यवस्थापनाकडून काम भूसंपादित क्षेत्रात सुरू आहे, असे निदर्शनास येत आहे. मात्र या बाबीकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
- प्रवीण हाडप, महामार्गबाधित शेतकरी
#################
(फोटो : टाय असलेला फोटो हा प्रवीण हाडप महामार्गबाधित शेतकरी यांचा आहे.)