आशेळेतील पाणीटंचाईबाबत
लहुजी शक्ती सेना आक्रमक
केडीएमसी मुख्यालयावर नागरिकांचा धडक मोर्चा
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्र. १६, कृष्णानगर, आशेळे परिसरात मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या तीव पाणीटंचाईच्या समस्येबाबत लहुजी शक्ती सेना आक्रमक झाली असून, त्यांनी आज नागरिकांसह केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली.
कृष्णानगर, आशेळे या परिसरातील नागरिकांना मागील एक वर्षापासून अत्यंत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अत्यावश्यक गरज असताना महापालिका प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला. या वेळी भाजपा कल्याण जिल्हा सचिव विजय जोशी यांच्या पुढाकाराने या मोर्चेकऱ्यांची केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली.
यावर येत्या ८ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असून, पाणी समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला. या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे नरेश गायकवाड, प्रकाश खंडागळे, कृष्णा साठे, सूरज रणदिवे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.