‘युती धर्माची आठवण
आम्हाला देऊ नका’
भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेनेचे प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून भाजपच्या भूमिकेनंतर आता शिवसेना शिंदे गटाने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मनसेबाबतचा अंतिम निर्णय शिवसेनेचे वरिष्ठ नेते घेतील, असे स्पष्ट करतानाच भाजपने शिवसेनेला अल्टिमेटम देण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी दिला.
अमित ठाकरे यांचे शिवसेना समर्थन करीत नाही. जे झाले ते चुकीचे झाले, अशी भूमिका कदम यांनी स्पष्ट केली; मात्र युती धर्माची आठवण करून देण्यापूर्वी भाजपने अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूरमधील राजकीय घडामोडींचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.
‘अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेससोबत गटस्थापना केली, भिवंडी महापालिकेत भाजपने नऊ नगरसेवक बाहेर काढून त्याच काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली, तर बदलापूरमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्या वेळी युती धर्म कुठे होता,’ असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. ‘उगीच युती तोडण्याच्या वलग्ना करू नयेत. आम्ही सक्षम आहोत. मनसेबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील,’ असे सांगत कदम यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.