भूमिपूत्रांची अनधिकृत बांधकामे नियमित होणार?
राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विशेष पाहणी दौरा
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा-भाईंदरचे भूमिपूत्र असलेल्या आगरी, कोळी व आदिवासी समाजाने गरजेपोटी केलेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्वसमावेशक धोरण तयार केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मिरा-भाईंदरमध्ये एक पाहणी दौरा येत्या ३ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील उत्तनसह मुर्धा, राई, मोर्वा, नवघर आणि गोडदेव यांसारख्या पारंपरिक गावांमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या भूमिपुत्रांनी वाढत्या कुटुंबासाठी वाढीव बांधकामे केली आहेत. त्यापैकी एका घरावर मिरा-भाईंदर महापालिकेने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. त्यावरून भूमिपूत्रांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ही नाराजी लक्षात घेऊन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या भूमिपूत्रांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारकडून ३ सप्टेंबरला विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्यात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल विभाग, वन विभाग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी करणार आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
----------
सर्वसमावेशक आणि सकारात्मक धोरण
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने गावकऱ्यांनी राहत्या घरांचा विस्तार केला तर त्यावर पालिका प्रशासन मोठ्या पोलिस बंदोबस्तात हातोडा चालवते. अशा परिस्थितीत या बांधकामांना परवानगी देण्यासाठी आयुक्तांना विशेष अधिकार देण्याची नवी नियमावली तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाहणी दौऱ्यानंतर तयार होणाऱ्या अहवालाच्या आधारे राज्य शासन आगरी-कोळीवाडे व आदिवासी पाड्यांसाठी सर्वसमावेशक आणि सकारात्मक धोरण जाहीर करेल, असे सरनाईक यांनी सांगितले.