बेलापूरच्या नैसर्गिक नाल्यात खडी टाकण्याचे काम
सेक्टर ३०-३१ मधील नागरिकांकडून प्रशासनाकडे खुलाशाची मागणी
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : बेलापूर सेक्टर ३०-३१ परिसरातील नैसर्गिक नाल्याच्या तळाशी खडी टाकण्याचे काम सुरू असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली आहे. या कामाचा उद्देश काय आहे, तसेच ते महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे की अन्य कोणत्या कामाचा भाग आहे, याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी सेक्टर ३०-३१ रेसिडेंट्स असोसिएशनने केली आहे.
यासंदर्भात असोसिएशनने शुक्रवारी (ता. ११) महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन दिले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि गाळ काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा नाल्यात काम करण्याची आवश्यकता का निर्माण झाली, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कामासाठी कोणत्या विभागाची मंजुरी आहे आणि कोणती यंत्रणा हे काम करीत आहे, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी शहर अभियंत्यांकडे विचारणा केली असता हे काम महापालिकेचे नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे काम करणारी यंत्रणा कोणती आणि तिच्याकडे आवश्यक परवानगी आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता करावी, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
नाल्याच्या तळाशी खडी टाकल्यामुळे भविष्यात त्याच्या स्वरूपात बदल होणार आहे का, याबाबतही नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. नाला बंदिस्त करून त्याचा अन्य कारणासाठी वापर करण्याचा कोणताही प्रस्ताव असल्यास त्याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर नाल्याजवळ महापालिकेचा फलक लावण्यात आल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळे कामाचा आदेश, तांत्रिक मंजुरी आणि संबंधित कंत्राटदाराची माहिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणी आहे.
पावसाळ्यातील जलप्रवाहाची काळजी आवश्यक
नैसर्गिक नाल्यांमधून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाणे महत्त्वाचे असल्याने कोणतेही काम करताना जलप्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. खडी टाकण्याच्या कामामुळे नाल्याच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार नाही ना, याची महापालिकेने पाहणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून कामाची माहिती स्पष्ट केल्यास नागरिकांच्या शंकांचे निरसन होण्यास मदत होईल.