अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेता विजेचा काटकसरीने व सुरक्षित वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्युत सुरक्षा व ऊर्जा बचत जनजागृती कार्यक्रम झाला. कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा निर्मिती, ऊर्जेचे विविध स्रोत आणि अक्षय ऊर्जेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. भविष्यातील ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सौर पॅनलद्वारे वीजनिर्मिती, त्यासाठी उपलब्ध योजना, ऊर्जेचा कार्यक्षम वापर तसेच विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपायांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यादव इंगळे आणि उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी ‘वीज बचत म्हणजेच वीजनिर्मिती’ हा संदेश देत वीज बचतीचे महत्त्व पटवून दिले. घराघरांत वीज बचतीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांमध्ये विद्युत ऊर्जेविषयी जागरूकता निर्माण करणे, ऊर्जेचे महत्त्व समजावून देणे आणि सुरक्षित व काटकसरीने वीज वापरण्याची सवय लावणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाला सहाय्यक अभियंता सुनील गायकवाड, वैभव भोईर, प्रवीण राठोड, विद्यालयाचे वागिश वरखेडकर, शैलेश रायकर यांच्यासह सुमारे ८० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जान्हवी जागरे यांनी मानले.