ऑक्टोबरमध्ये राज्यभर तरुणाईचा नाट्यजल्लोष
‘सकाळ करंडक’ची मुंबई विभागीय अंतिम फेरी ८ ऑक्टोबरला
पुणे, ता. १६ : राज्यभरातील तरुण रंगकर्मींचे लक्ष लागलेल्या राज्यस्तरीय ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पडदा ३ ऑक्टोबरला उघडणार आहे. ३ ते ३० ऑक्टोबरदरम्यान राज्यभरातील सहा केंद्रांवर स्पर्धेची विभागीय अंतिम फेरीत तरुणाईचा नाट्यजल्लोष रंगणार आहे. मुंबई विभागीय अंतिम फेरी ८ ऑक्टोबरला माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात होणार आहे. १८ नोव्हेंबरला पुण्यात महाअंतिम फेरी रंगणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या सहा केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. मराठवाडा विभागाच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ ऑक्टोबरला होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीने स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर पुणे विभाग ५ ते ७, मुंबई ८, उत्तर महाराष्ट्र (नाशिक) १४, कोल्हापूर २३, विदर्भ विभाग (नागपूर) ३० याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे. सहा विभागांपैकी प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. १८ नोव्हेंबरला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ही महाअंतिम फेरी होणार आहे. यातून स्पर्धेचा ‘महाविजेता’ घोषित करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन रंगभूमीवरील नव्या पिढीच्या कल्पकतेला, अभिनयाला आणि दिग्दर्शनाला वाव देणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील मानाच्या स्पर्धांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतून राज्यभरातील तरुण कलाकारांना आपली कलात्मक क्षमता सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक महाविद्यालयांनी ७०५८१५११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.
...
स्पर्धेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख
महाविद्यालयीन रंगभूमी ही मराठी नाट्यविश्वाची खरी प्रयोगशाळा मानली जाते. याच रंगभूमीवरून अनेक कलावंतांनी व्यावसायिक नाट्य, चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात यशस्वी वाटचाल केली आहे. त्या परंपरेला नवी ऊर्जा देण्याचे काम गेल्या काही वर्षांत ‘सकाळ करंडक’ सातत्याने करत आहे. केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर नव्या पिढीतील कलागुणांना दिशा देणारे, सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि दर्जेदार एकांकिकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून या स्पर्धेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.