सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : एकीकडे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना दुसरीकडे डोंबिवलीतील काही भागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रभाग क्र. २७ मधील पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर, अंबिकानगर तसेच प्रभाग क्र. १९ मधील सागर्ली, एमआयडीसी, इंदिरानगर आणि खंबाळपाडा परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनीच आज (ता. २) महापालिका प्रशासनाविरोधात ‘पाणीबाणी मोर्चा’ काढला. हातात चमचे घेऊन काढलेल्या या मोर्चातून ‘चमचाभर तरी पाणी द्या’, असा उपरोधिक संदेश प्रशासनाला देण्यात आला.
गेल्या महिनाभरापासून संबंधित भागांमध्ये अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही इमारतींमध्ये अनेक दिवस पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांची मोठी गैरसोय होत आहे. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ काही नागरिकांवर आली आहे. या प्रश्नाबाबत भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाठपुरावा केला; मात्र जलवाहिन्यांची पाहणी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने मोर्चा काढावा लागल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्वी या भागात पाच तास पाणी मिळायचे. रात्री बायपासचे पाणीही येत होते; मात्र गेल्या दहा वर्षांपासून ही व्यवस्था बंद आहे. आता पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महापालिकेच्या गेटवर बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा नगरसेवक महेश पाटील यांनी दिला.
पाणीचोरी झाल्याचा दावा
२७ गावांमधील काही भागांत पाणी चोरीच्या घटना आढळून आल्या आहेत. जलवाहिनीवर बूस्टर लावून पाणी उपसले जात असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाते. मनुष्यबळाची कमतरता असली तरी यापुढेही अशा प्रकारांवर कारवाई सुरूच राहील. संबंधित भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.