मुंबई- गलवाण खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत लष्कराच्या 20 जवानांना वीरमरण आलं. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करुन संजय राऊत यांनी मोदींना थेट सवाल उपस्थित केलेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी एकापाठोपाठ दोन ट्वीट करून चीन प्रकरणावर बोलण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल. संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य काय आहे? काहीतरी बोला, अशी विचारणा केली आहे.
चीनच्या या मुजोरीला भारत कधी सडेतोड उत्तर देणार आहे? बिना गोळीबार केल्या आपले 20 जवान शहीद झाले आहे. आपण असं काय केलं आहे? चीनचे किती जवान मारले गेले आहे ? असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.
चीन हा आपल्याच भूमीवर पाय रोवून उभा आहे. त्याने खरंच घुसखोरी केली आहे का? पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र सत्य परिस्थिती काय आहे? बोला, काहीतरी बोला. काही तरी सांगा. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे. जय हिंद!” अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
याआधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारले आहेत. पंतप्रधान गप्प का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत.
आता खूप झाले आहे. पंतप्रधान मोदी शांत का आहे. चीनच्या सीमेवर नेमकं काय झालं आहे. हे देशाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमतच कशी झाली? त्यांची हिंमत कशी झाली आपली जमीन घेण्याची? असा सवाल थेट राहुल गांधींनी मोदींना विचारला आहे.
लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षात 20 जवान हुतात्मा झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारला जाब विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.