नांदेड : भारतीय हवामान विभागाने देशात मान्सून वेळेवर दाखल झाल्याचे जाहीर केल्यामुळे शेतकर्यांनी पेरण्यांसाठी लगबघ सुरु केली. ज्या भागात पावसाचे आगमण झाले, अशा ठिकाणी खरिपातील पेरण्यांही सुरु केल्या. परंतु मागील आठ दिवसापासून पावसाने हूलकावणी दिल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात २७ हजार ८३१ हेक्टरनुसार चार टक्के क्षेत्रावरच पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र सात लाख ६६ हजार ८०६ हेक्टर आहे. यात सर्वाधीक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित आहे. दरम्यान यंदा वेळेवर पावसाचे आगमण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. यानुसार काही भागात पावसाचे आगमनही झाले. यामुळे शेतकर्यांनी पावसाच्या आशेवर खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मुग, ज्वारी, हळद आदी पिकांची पेरणी केली. रविवार अखेर जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३.६३ टक्क्यांनुसार २७ हजार ८३१ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्राने दिली.
पावसाची सरासरी चार मिलीमीटरची नोंद
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ८१४.४० मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मान्सूनपूर्व तसेच मान्सूनचे आगमण झाल्यानंतर पावसाचे दमदार आगमण झाले नाही. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी ६८ मिलीमीटरनुसार केवळ ४.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊसही ठराविक भागातच झाला आहे. दरम्यान बुधवारी (ता. २२) मृग नक्षत्र संपून सुर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यात वाहन मेंढा असल्याने पावसाचे आगमण होईल, असा अंदाज जानकार व्यक्त करीत आहेत.
पिकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र
जिल्ह्यात सात लाख ६६ हजार ८०९ सर्वसाधारण क्षेत्रापेकी २७ हजार ८३१ हेक्टरवर पेरण्यांची कामे झाली आहेत. यात सोयाबीन-पाच हजार ४४३ हेक्टर, कपाशी-२१ हजार २७७ हेक्टर, तूर-एक हजार ४२ हेक्टर, मुग-३५ हेक्टर, उडीद-३४ हेक्टरवर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
अशी घ्यावी काळजी
भरपूर मोठा पाऊस झाल्यानंतर पेरणीची घाई न करता, जमिनीतील उष्णता कमी झाल्यानंतरच पेरणी करावी.
१५ जुलैपर्यंत शेतकरी खरीपाची पेरणी करु शकता
शक्यतो घरचे बियाणे शुद्ध, चांगले आणि उगवण क्षमता चांगली असेल तर बीज प्रक्रिया करून तेच बियाणे वापरा.
ज्या शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण केले आहे त्यांनी त्याप्रमाणे खत व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.
- डॉ. देविकांत देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी.
जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने खरिप पेरण्यांची कामे सुरु झाली आहेत. आजपर्यंत २७ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्याची माहिती क्षेत्रीयस्तरावरुन मिळाली. पेरण्यांची वेळ आजूनही गेली नाही. यामुळे शेतकर्यांनी शंभर मिलीमीटर पावसानंतरच पेरणी सुरु करावी.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.