सांगली : संचारबंदीच्या अटी शिथिल करताना पब्लिक वाहन असलेल्या रिक्षांचाच प्राधान्याने विचार करावा. सोशल डिस्टन्सींग पाळून सार्वजनिक वाहतूक सुरु ठेवण्याची क्षमता रिक्षाची असल्याने त्यांना मुभा द्यावी अशी मागणी रिक्षा वाहतूकदार संघटनेचे नेते महादेव पवार यांनी आज "सकाळ'शी बोलताना केली. जिल्ह्यात सुमारे साडेनऊ हजारांवर रिक्षाचालकांची सध्याच्या टाळेबंदीत होरपळ सुरु असून त्यांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले,"" आधीच घायकुतीला आलेला रिक्षाचालक सध्याच्या आस्मानी संकटाने पुरता कोसळला आहे. केवळ जिल्ह्यात साडेनऊ हजारांवर कुटुंबाची परवड सुरु आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे साडेचार हजारांवर रिक्षाचालक आहेत. बहुतेक रिक्षाचालक कर्जबाजारी आहेत. त्यांचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपन्यांकडून तगादा लावला जात आहे. दंड व्याजाच्या धमक्या दिल्या जात आहेत. शासनाने तीन महिन्याचे दंड-व्याज माफ करून हप्त्यांची मुदत वाढवून द्यावी. बीएस-4 प्रकारच्या खरेदी रिक्षांची नोंदी, पासिंग, परवाना नुतनीकरणासाठी मुदतवाढ द्यावी. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी तसेच तातडीची वाहतूक सेवा म्हणून रिक्षांना सध्याच्या संचारबंदीच्या काळात मुभा द्यावी. संचारबंदी शिथिल करताना या मागणीचा विचार प्राधान्याने व्हावा. कारण रिक्षा हे अत्यावश्यक सेवेतीलच वाहन आहे.''
जिल्ह्यातील रिक्षावाहतूकदारांचे नेते रामभाऊ पाटील (सांगली), अरुण धनवडे, सुलेमान शेख, बाबु आटपाडे, मन्सुर नदाफ, शकील सय्यद (मिरज), नाना भोसले (कवठेमहांकाळ), आबा खांडेकर (जत), राजू बाबर ( तासगाव), किरण कुरकुटे , पांडुरंग भिंगारदिवे (विटा) हणमत मंडले (खानापूर), सतिश िंभंगे (आटपाडी), सतिश खुळे, हणमंत जाधव, सनी खराडे (वाळवा) आदींची फोनवरून संयुक्त बैठक झाली. त्यानंतर वरील मागण्यांबाबत निर्णय झाला.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.