पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेसाठी भाजप अस्वस्थ

युवराज पाटील

विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती कायम राहण्याची चिन्हे असल्याने कोल्हापूर उत्तरसाठी अस्वस्थ झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य केले आहे. मुंबईमध्ये जसे ‘एकच स्पिरीट, नो किरीट’ हे वाक्‍य गाजले, तशीच स्थिती कोल्हापुरात निर्माण करण्याच्या तयारीत भाजपचे पदाधिकारी आहेत.

कोल्हापूर शहर पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. दिलीप देसाई शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. सुरेश साळोखे दोन वेळा, नंतर राजेश क्षीरसागर यांनी दुसऱ्यांदा शहराचे नेतृत्व केले. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढली. शिवसेनेकडून आमदार क्षीरसागर, तर भाजपकडून महेश जाधव यांनी निवडणूक लढविली. मोदी लाटेत जाधव यांना सुमारे ४२ हजार इतकी मते मिळाल्याने जाधव यांच्यासह भाजपचा आत्मविश्‍वास वाढत गेला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सातत्याने महेश जाधव यांचा उल्लेख भाजपचे नेते असे करतात. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर जाधव यांचा उत्साह अधिक वाढला.  

आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात भूमिका घ्यायला त्यांच्या पक्षातील काही मंडळी कारणीभूत आहेत. ते रेकॉर्डवर येत नसले तरी त्यांचा छुपा पाठिंबा भाजप पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेला आहे. शिवसेनेपेक्षा तू मोठा की मी मोठा, यातून इर्ष्येचे राजकारण पेटत गेले. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर उत्तरमधून आगामी विधानसभेसाठी क्षीरसागर नको, अशी भूमिका घेतली. क्षीरसागर यांनीही आपल्याच पक्षातील लोकांशी मिळतेजुळते न घेता शिवसेनेपेक्षा आमदार गट अधिक महत्त्वाचा मानल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली.

पक्षांतर्गत त्यांच्या विरोधकांनी भाजपला हाताशी धरून क्षीरसागर कसे अडचणीत येतील, यासाठी प्रयत्न केले. भाजप पदाधिकाऱ्यांनी काल क्षीरसागर यांच्या विरोधात भूमिका घेण्यामागे अंतर्गत विरोधही कारणीभूत आहेत. विधानसभा निवडणूक लागली की, अनेकजण गाड्या काढून ‘मातोश्री’ गाठतात; पण उमेदवारी आपल्यालाच मिळते, यावर क्षीरसागर यांचा विश्‍वास आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याशी त्यांचे वाद झाले. मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोरच खडाजंगी झाली. रावते यांच्यासह संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनाही वादाची कल्पना आहे. मात्र, आमदार गट विरुद्ध पवार यांच्यातील वाद असाच सुरू राहावा, अशी भूमिका या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. ते शिवसेनेसोबत होते; पण आमदार गट म्हणून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले ते ‘इलेक्‍टिव्ह मेरीट’ हा निकष लावूनच.

सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या तक्रारींची फाईल भाजपने तयार केली आहे. पालकमंत्र्यांना क्षीरसागर यांनी गेल्या साडेचार वर्षांत लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, हेही कारण यामागे आहे. खंडणीच्या गुन्ह्यामुळे क्षीरसागर अस्वस्थ झाले, यामागे कटकारस्थान असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पालकमंत्र्यांनी मनात आणले, तर ते कोल्हापूरची जागा भाजपला सोडवू शकतात, असा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

मध्यंतरी पालकमंत्र्यांनी आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची उत्तरसाठी मागणी केली होती. या निवडणुकीत सतेज पाटील थेट धनुष्यबाणाच्या बाजूने उतरले आहेत. ऋतुराज शिवसेनेचे उमेदवार असतील काय? अशी चर्चा असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांची शिवसेनेने जी अवस्था केली, त्याच धर्तीवर क्षीरसागर यांच्या कोंडीचा प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेण्यात सक्षम आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीही पक्ष तुमचा आणि उमेदवार माझा, असे सांगण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे यांनी प्रा. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. कोल्हापूर उत्तरची जागा बदलायचीच झाली तर त्यास ठाकरे कितपत प्रतिसाद देतात, हे ही महत्त्वाचे आहे.

लोकसभेत स्वतंत्र यंत्रणा राबवल्याचेही कारण
महापालिका निवडणुकीवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्षीरसागर यांची ही शेवटची आमदारकी असे म्हटले होते. नंतर क्षीरसागर यांनी गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साऊंड सिस्टीमला परवानगी द्या, अशी भूमिका घेतली. येथेही वादाची ठिणगी पडली. क्षीरसागर कुठे चुकतात, याची वाटच भाजपचे ठराविक पदाधिकारी पाहत होते. क्षीरसागर यांनी या निवडणुकीत स्वतंत्रपणे प्रचारयंत्रणा राबविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT