कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करा आणि अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतुद करा, या मागणीचे निवेदन सहा जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांनी केले. सर्किट बेंचचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी लवकरच मुंबईत संयुक्त बैठक घेऊ, अशी ग्वाही दिली. त्यामुळे सर्किट बेंचच्या लढ्याला न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकारांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्किट बेंचसासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याचा गेल्या 34 वर्षांपासून लढा सुरू आहे. सहाही जिल्ह्यात दोन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे; पण अद्याप लढ्याला यश आलेले नाही. सर्व पक्षीय खंडपीठ नागरी कृती समितीची नुकतीच कोल्हापुरात बैठक झाली. त्यात आमदार सतेज पाटील यांनी सहा जिल्ह्यातील आमदारांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करतो, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत सर्किट बेंचचे पुढील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. आमदार पाटील यांनी दिलेल्या आश्वासानानुसार हिवाळी अधिवेशात सहा जिल्ह्यातील आमदारांना एकत्रित घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.
हेही वाचा - राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी मांडली चुल...
निवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा यांनी केवळ कोल्हापुरातच मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, याबाबतचा अहवाल दिला आहे. असे असतानाही सर्किट बेंच स्थापनेत दिरंगाई होत आहे. ही मागणी दुर्लक्षित होत असल्याच्या भावाना सहा जिल्ह्यातील जनतेत निर्माण झाली आहे. सर्किट बेंच स्थापनेसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातच सर्किट बेंच व्हावे, याला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे पत्र मुख्य न्यायाधिशांना जानेवारी 2019 मध्ये पाठवले. याबाबत तत्काळ सभा घेऊन हा प्रश्न जलदगतीने सोडविण्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री या नात्याने सर्किट बेंचच्या प्रश्नात आपण व्यक्तीःश लक्ष घालून पाठपुरावा करावा, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्किट बेंचसाठी तरतूद करावी, अशी विनंती आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी त्यांनी सर्किट बेंचचा प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच याबाबत सर्वांच्या उपस्थितीत लवकरच मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
हेही वाचा - तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला...
शिष्टमंडळात 'यांचा' समावेश
शिष्टमंडळात सर्वश्री आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, राजू आवळे, सुरेश खाडे, शहाजी बापू पाटील, शेखर निकम, वैभव नाईक, महेश शिंदे, विश्वजित कदम, विक्रम सावंत, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण आदींचा समावेश होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.