कर्जत - तालुक्यातील ताजूसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. सुसाट वारा आणि गारपिटीमुळे पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनामुळे सर्व काही ठप्पच आहे. त्यातच या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पावसाने भुईमूग, द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या. हा पाऊस शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात घेऊन गेला.
काल सायंकाळी तालुक्यातील ताजु,तळवडी, जलालपूर यासह परिसरात अचानक सुसाट वारा सुटला. या पाठोपाठ विजांचा कडकडाट करीत टपोरे थेंब असलेल्या पावसाचे आगमन झाले. पावसाने वेग घेताच गारांचा वर्षाव सुरू झाला छोट्या लिंबाच्या आकाराच्या गारा एकसारख्या कोसळत होत्या .या मुळे या भागातील उन्हाळी भुईमूग, कांदा, डाळिंब, द्राक्ष आणि ऊस या पिकांना व फळबागांना मोठा फटका बसला.
या परिसरात हजार हेक्टरवर शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या खाली पडून मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे स्थळ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ताजूचे सरपंच पांडुळे यांनी केली आहे.
या बाबत संबंधित मंडलाधिकारी व गावातील तलाठी यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करीत वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्याचा अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन नियमानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल.
- छगन वाघ, तहसीलदार, कर्जत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.