सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून "एफआरपी'चे पैसे मिळताना दिसत नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याचे 1 हजार 147 कोटी रुपये मिळालेले नाहीत. सध्या पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या मशागतीला जोर आला आहे; परंतु मशागत, खते व बी-बियाणे यांसह अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळेनात. तुरीचे पैसे बहुतांशी शेतकऱ्यांना मिळाले; परंतु 1 मार्च ते 13 जून या कालावधीत हमीभावाने खरेदी केलेल्या हरभऱ्याची रक्कम सुमारे एक लाख शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही. तसेच सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा अद्यापही हमीभावाने खरेदी करण्यात आलेला नाही. ज्या-ज्या शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी झालेली नाही, त्यांना राज्य शासनाकडून प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे; परंतु अद्यापही बहुतांशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत खासगी सावकाराचे दार ठोठावण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान, याबाबतीत सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. तुरीचे न शिजलेले वरण तूर नोंदणी शेतकरी - 4,58,306 हमीभावाने तूर खरेदी - 25,87,916 क्विंटल वाटप केलेली रक्कम - 967.75 कोटी न मिळालेली रक्कम - 430 कोटी शिल्लक शेतकरी - 1,81,447 हरभरा नोंदणी शेतकरी - 3,02,728 हमीभावाने हरभरा खरेदी - 19,02,000 क्विंटल न मिळालेली रक्कम - 717.88 कोटी शिल्लक शेतकरी - 1,42,028 |