सांगली - जिल्ह्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीचा टक्का यंदा घसरला आहे. युरोप, आखाती देशात ८०४ कंटेनर म्हणजे ११ हजार ५६९ टन द्राक्षांची निर्यात झाली. गतवर्षी जिल्ह्यातून ४ हजार २८३ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली होती. २ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरील १९ हजार ४९२ टन द्राक्षाची निर्यात झाली होती. यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीप्रमाणे युक्रेन-रशिया युद्धामुळे वाहतुकीची बंद पडलेली व्यवस्था निर्यात कमी होण्यास कारणीभूत ठरली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील बहुतांशी क्षेत्र सिंचनाखाली आल्याने द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी आणि पेरुची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. मिरज, तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. सुमारे ३१ हजार ४०० हेक्टरवर द्राक्षशेती आहे. निर्यातक्षम पिके जादा चलन मिळवून देत आहेत.
यंदाच्या हंगामात कृषी विभागाने २० हजार टन नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले होते. निर्यात वाढीसाठी कृषीने पुढाकार घेत प्रत्येक गावात निर्यातीसाठी जनजागृती केली. निर्यात नोंदणी, नूतनीकरणासाठी शेतकरी पुढे आले. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी, बाजारपेठेतील चढउतार, रशिया-युक्रेन युद्ध निर्यातीला अडथळे ठरले आहेत. यावर्षी द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परंतु, अवकाळीमुळे बागायतदारांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मागणी घटल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभारले. यंदा द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी आणि क्षेत्र वाढले असले तरी द्राक्षाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच सातत्याने येणाऱ्या संकटांचा परिणाम द्राक्ष्यांवर झाला असून निर्यातही घटली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.