पारनेर (नगर) : ""युती होणार का, याबाबत जोरदार चर्चा आहे. युती झाली नाही तर लोक आम्हाला काय म्हणतील? "तीन महिन्यांपूर्वी ही मंडळी एका ताटात जेवत होती. एकमेकांना "आय लव्ह यू' म्हणत होती. आता काय झाले?' मग युती तुटली तर आम्ही एकमेकांवर कशी टीका करणार,'' असा प्रश्न सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज उपस्थित केला आणि "युती होणारच' हे स्पष्ट केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रांजणगाव मशीद ते अस्तगाव या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, सभापती राहुल झावरे, राहुल शिंदे, अनिकेत औटी, भाजप महिला आघाडीप्रमुख अश्विनी थोरात, रामचंद्र मांडगे, सागर मैड, डॉ. वर्षा पुजारी, सरपंच मनीषा पवार आदी उपस्थित होते. औटी यांच्याबाबत पाटील म्हणाले, ""औटी चौकार मारून पुन्हा विधानसभेत जाणार आहेत आणि पुन्हा उपाध्यक्ष होणार आहेत.'' औटी म्हणाले, ""गेल्या 73 वर्षांत जलशक्ती मंत्रालयाची स्थापना झाली नव्हती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आता मोदींच्या संकल्पनेतून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी आल्याशिवाय राहणार नाही.'' ज्या मतदारसंघात धनुष्यबाणाचे चिन्ह आहे, तेथे धनुष्यबाण व जेथे कमळाचे चिन्ह आहे, तेथे कमळासमोरचे बटन दाबा, असे सांगून औटी यांनी आजच प्रचाराला सुरवात केली. राहुल शिंदे आणि राहुल झावरे या दोघांनाही चांगले भवितव्य असल्याचेही ते म्हणाले. महेश देशमुख यांनी स्वागत केले. आप्पासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक आणि भाऊसाहेब भोगाडे यांनी सूत्रसंचालन केले. मतलब के लिए बाप बदलनेवाले लोग! "सध्या कार्यकर्त्यांचे रक्त चेक करून घेणे गरजेचे आहे. कारण, मतलब के लिए बाप बदल देनेवाले लोग हैं,' असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर टीका केली. "आजकाल राजकारणात सर्वांत श्रीमंत कोण, तर ज्याचे कार्यकर्ते निष्ठावान तोच होय! आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालो आहोत. नेते फुटले; मात्र आमचे कार्यकर्ते फुटले नाहीत,' असे सांगत, "शिवसेना धर्मांध नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. |