कोयनानगर - कोयना धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. शिल्लक दहा टीएमसी पाणीसाठ्यांवर पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी संबंधित वीज कंपनीने अधिकार सांगितला आहे. अशा स्थितीत कर्नाटकला कोयनेतून पाणी द्यायचा विचार झाल्यास ते वीज निर्मितीसाठीचा पश्चिमेकडील शिल्लक पाणीसाठ्यातून द्यावे, अशी अपेक्षा सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांनी व्यक्त केली.
गुणाले म्हणाले, ‘‘कोयनेतून सांगलीसाठी सोडलेल्या पाण्याची मुदत आणखी पाच दिवसांने वाढविण्यात आली आहे. शासनाने मानवी दृष्टिकोनातून पूर्वेकडील दुष्काळ निवारण धरणातून सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी वापर केला आहे. पूर्वेकडील सांगली जिल्ह्यात दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे कोयना धरणातून पूर्वेकडील पडलेला दुष्काळ निवारण करणे व जनतेची तहान भागविण्यासाठी आतापर्यंत ३४.९८ टीएमसी पाणीसाठा दिला आहे.
पूर्वेकडील सिंचनासाठी प्रथम प्राधान्य असल्याने किमान ५० टीएमसी पाणीसाठ्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यातच कर्नाटक राज्याने कोयना धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी केल्यामुळे पाणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. कोयना धरणातून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी आतापर्यंत ५४.५९ टीएमसी पाण्याचा वापर वीज कंपनीने केला आहे. ९.५८ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर करणे शिल्लक आहे. कोयना धरणात सध्या २९.१४ टीएमसी एवढा अत्यल्प पाणीसाठा आहे. यातील ९.५८ टीएमसी पाणीसाठ्यांचा वापर पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी केला जाणार आहे.
पूर्वेकडे व पश्चिमेकडे पूर्ण क्षमतेने धरणातील पाण्याचा
वापर होत असल्याने धरणात मेअखेर पाण्याचा दुष्काळ पडणार आहे. कोयना धरणात सध्या २३ टक्के पाणीसाठा आहे. धरणात
पाण्याचा खडखडाट होत आहे. धरणातील ७.५० टीएमसी पाणीसाठा बाष्पीभवनाने मृत झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.