कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी उद्या (मंगळवार) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर बाजार समिती, गुळ, भाजीपाला मार्केट, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, सराफ बाजारही बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.
दिल्ली येथे गेल्या 11 दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या 500 हून अधिक संघटनांच्या "किसान संघर्ष समन्वय समिती' या देशव्यापी मंचाने भारत बंदची हाक दिली आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला व भारत बंदला कोल्हापूर जिल्ह्यातून विविध संघटना, पक्ष, संघ, व्यापारी, उद्योजक पाठबळ देत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधी तीन काळे कायदे केले आहेत. हे कायदे ताबडतोब रद्द केले पाहिजेत. किसान संघटना, शेतकरी संघटनांशी चर्चा केल्याशिवाय कृषी कायद्यांमध्ये कोणतेही बदल करू नयेत. किमान आधारभूत भाव व खरेदी प्रक्रियेचा कायद्यात समावेश करावा. शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागण्या केंद्र शासनाने ताबडतोब मान्य करून आंदोलनामध्ये न्याय्य तोडगा काढावा या मागण्यांना अंगणवाडी कृती समिती संपूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. पुढील काळात देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनांना सक्रीय पाठिंबा दिला जाईल असे देखील घोषित करत आहे.
कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकारने जसे कामगार कायदे मोडीत काढून त्यांचे रुपांतर मालक धार्जिण्या श्रमसंहितांमध्ये केले त्याचप्रमाणे त्यांनी संसदेची लोकशाही कार्यपद्धती धाब्यावर बसवून, राज्यांच्या अधिकारांवर गदा आणून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे तीन काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत. या कायद्यांमुळे किमान हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याची व्यवस्था संपुष्टात येऊन शेतकऱ्यांना बड्या कॉरपोरेटसच्या व खाजगी बाजारांच्या हवाली केले जाणार आहे. शेतीच्या कंत्राटीकरणामुळे शेतकऱ्यांच्या जमीनी कॉर्पोरेटसच्या ताब्यात जाणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या 11 ला बिंदू चौक येथून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत रॅली काढली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष प्रा. जालंधर पाटील यांनी सांगितले. तर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने अतुल दिघे, एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर,भगवान देशमुख, सुवर्णा तळेकर व जयश्री पाटील यांनी सहभाग घेणार असल्याचे सांगितले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.