जयसिंगपूर - पंचगंगेत दोन दिवसांपासून पुन्हा रासायनिक आणि फेसाळ पाणी वाहू लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून पात्रात आज हजारो मृत मासे तरंगताना आढळले. त्याने नदीकाठावर दुर्गंधी सुटली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित घटकांवर ठोस कारवाई करावी, कागदी घोडे नाचवू नयेत, अशी मागणी नागरिकांची आहे.
तेरवाडजवळ प्रकार; पंचगंगेत रासायनिक पाण्याचा परिणाम
पंचगंगेच्या पात्रात परवा (ता. १४) पासून रासायनिक आणि फेसाळ पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ गांभीर्याने पाहत नसल्याने अनेक गावांत संताप व्यक्त होत आहे. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी इचलकरंजीत प्रदूषणाबाबत पाहणी केली होती; तर तहसीलदारांकडून पाहणी केल्यावर सामाजिक कार्यकर्ते पुन्हा मृत माशांचा खच विश्वास बालिघाटे, बंडू पाटील, बंडू उमडाळे यांनी प्रदूषणाची व्यथा मांडली होती. शनिवारी दिवसभर प्रदूषणामुळे जनावरांनीही पाण्याला तोंड लावले नाही. रासायनिक पाण्यामुळे अनेक ठिकाणी पाण्यावर फेसाचे थर वाहात होते, तर मृत माशांमुळे दुर्गंधीत भर पडली आहे.
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सातत्याने आंदोलने केली जात आहेत. २३ वर्षांत अनेक गावांत आंदोलने करून अधिकाऱ्यांना मृत माशांचा हार, मोर्चे, निवेदने अशी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रदूषणाचा प्रश्न सुटलेला नाही. दरम्यान, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आजवर अनेक पक्ष, संघटना आणि नेत्यांनी आंदोलने केली. निवडणुकीच्या प्रचारात मुद्दा ठळकपणे मांडला जातो. त्यानंतर मात्र हा प्रश्न तसाच कायम असल्याचा अनुभव लोकांना येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.