जयसिंगपूर : विधान परिषदेपाठोपाठ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीत मुदत संपलेल्या नगरपालिकांची कच्ची प्रभाग रचना बहुसदस्यीय रचनेनुसार ३० नोव्हेंबरपूर्वी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या पालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहराच्या विकासाला गती देण्यासाठी १७ टक्के लोकसंख्या वाढ गृहीत धरून सदस्य संख्या वाढवण्याबाबत शासन पातळीवर चर्चा झाली. अद्याप निर्णय नसल्याने याबाबत संभ्रम आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना आल्या. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या हालचाली वेगवान होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या सहलीवरून आल्यानंतर नगरसेवकांना मतदार संघावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगरपालिकेत १७ टक्केचा आदेश झाला तर या प्रत्येक नगरपालिकेत किती प्रभाग वाढणार याबाबत उत्सुकता आहे. शासनाने अध्यादेश लागू केला आहे. यामध्ये अ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांच्या संख्येमध्ये दोनने वाढ केली आहे. अ वर्ग नगरपालिकेमध्ये किमान सदस्य संख्या ४० असेल आणि ७५ पेक्षा अधिक नसेल.
ब वर्ग नगरपरिषदेसाठी निर्वाचित पालिका सदस्य संख्येत दोनने वाढ केली आहे. ब वर्ग नगरपालिकेसाठी किमान सदस्य संख्या २५ असेल आणि ३७ पेक्षा अधिक नसेल. क वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये ३ ने वाढ केली आहे. येथे किमान सदस्य संख्या २० असेल आणि २५ पेक्षा अधिक नसेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.