आनंदराव देसाई राधानगरी मतदार संघाचे माजी आमदार. त्यांचा वारसा मुलगा बजरंग देसाई यांनी चालवला. बजरंग देसाई "अण्णा' टोपण नावाने मतदार संघात फेमस. दोन वेळा आमदार होऊन त्यांनी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यासाठी 3997 नंबर लकी ठरला. कार्यकर्तेही या नंबरच्या प्रेमात पडले. मुलगा धैर्यशील व राहुल यांनी राजकारणात प्रवेश केलाय. धैर्यशील गोकुळचे संचालक तर राहुल जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्या गाड्यांवर वडिलांच्या नंबरलाच ग्रीन सिग्नल मिळालाय.
अण्णांचे वडील आनंदराव देसाई यांना राजकारणाची दिशा माहीत होती. शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म. खेड्यापाड्यातल्या लोकांशी त्यांचा नेहमीच संपर्क. तिथल्या अडचणींचा डोंगर त्यांनी जाणला होता. गावात समृद्धतेचे वारे वाहावेत, यासह वैचारिक चळवळीला बळ मिळावे, हाही त्यांचा उद्देश होता. शाहू वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी वाहिली. समाजकारणातून राजकारण करत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. आमदार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळत राहिली. गावागावांत देसाई गट स्थापन झाला. या काळात अण्णा वडिलांचे राजकारण जवळून पाहत होते. ते राज्यशास्त्र विषयातून पदवीधर झाले. त्यांनी 1985 च्या निवडणुकीत बाजी मारली. निवडणुकीतल्या विजयासह त्यांच्या घरात नवीन जीप आली. तिचा क्रमांक 3997 होता. अण्णांनी 1999 ला दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना पुन्हा मतदारसंघाच्या सत्तेची सूत्रे दिली. याचवर्षी नवीन फियाट देसाई कुटुंबियांच्या सेवेत आली. फॉच्युर्नर, टोयाटो, इनोव्हा गाड्यांची खरेदी झाली. जीपचा नंबर विजयाची खात्री देणारा होता. तोच नव्या गाड्यांकरिता घेतला गेला.
अण्णांवर प्रेम करणारे काही कमी नाहीत. प्रत्येक गावात त्यांना आजही मानसन्मान मिळतो. राजकारणातील अनेक पावसाळे अण्णांनी पाहिले. पाच वर्षानंतर राजकारणाची बदलणारी कुस अनुभवली. राधानगरी-भुदरगड मतदार संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळत राहिली. अण्णांच्या राजकारणाला मात्र पूर्णविराम मिळालेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत अण्णांच्या पाठिंब्याला महत्त्व येते. मुलगा धैर्यशील व राहुल वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरलेत. कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ)च्या माध्यमातून धैर्यशील कार्यरत आहेत. दूध संस्थांच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. राहुल जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचाही कार्यकर्त्यांचा गट आकाराला आला आहे. शांताराम तौंदकर, बी. एस. पाटील, सुरेश देसाई हे देसाई कुटुंबीयांचे हक्काचे कार्यकर्ते आहेत. त्यांनीही त्यांच्या गाड्यांकरिता अण्णांच्या नंबरलाच पसंती दिली आहे.
धैर्यशील देसाई म्हणतात, ""हा नंबर आमच्यासाठी लकी ठरला. घरात नव्या गाड्या घेत असताना या नंबरचा आम्ही आग्रह धरतो. अण्णांच्या पहिल्या निवडणुकीपासून नंबरला महत्त्व प्राप्त झाले आहे.''
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.