कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून (Maratha Reservation) आरक्षण मिळालेच पाहिजे, असा ठराव आज येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. राजारामपुरीतील (Rajarampuri) सूर्या हॉलमध्ये बैठक झाली.
ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे ; सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव मंजूर
अॅड. कृष्णात सासवडेकर म्हणाले, "उग्र आंदोलनाने काहीही साध्य होणार नाही. आरक्षण कसे मिळवायचे, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कालेलकर, बापट, देशमुख, मंडल, गायकवाड समितीचे अहवाल का नामंजूर झाले, याचा अभ्यास करून आयोगातील त्रुटी दूर करायला हव्यात. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण कसे मिळविता येईल, यासाठी मराठा समाजाने सखोल माहिती संकलनासाठी व्यापक समित्या स्थापन करून बैठका घेणे आवश्यक आहे."
बाबा इंदूलकर म्हणाले, "शासन आरक्षणावर बोलत नाही. जुने आयोग का फेटाळले, याची तपासणी झाली पाहिजे. मराठ्यांना मागास दाखवू शकेल, असा अहवाल तयार करावा लागेल. उग्र आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही."
प्रा. जयंत पाटील म्हणाले, "मूक आंदोलनाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षणाची नितांत आवश्यकता असूनही सरकार आरक्षण देण्याच्या तयारीत नाही. समाजाची चेष्टा करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे."
ॲड. विवेक घाटगे म्हणाले, "समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कायदेशीर लढाई विनामूल्य लढली जाईल. मराठा समाज कधीही खचलेला नाही. यापुढे खचूनही चालणार नाही. आरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेणे आवश्यक आहे." संजय पाटील म्हणाले, "आरक्षणाचा कायदा का बदलत नाही? आरक्षणाशिवाय समाजाला कोणताच पर्याय राहिलेला नाही. मागून मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची भूमिका असायला हवी.’’ प्राचार्य डी. आर. मोरे म्हणाले, "५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला असून, केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी. लोकशाही नाही तर ठोकशाही मार्गाने आंदोलन करावे.’’
डॉ. संदीप पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात मराठ्यांवर अन्याय होत असल्याचे, तर माजी नगरसेविका रूपाराणी निकम यांनी आरक्षणाच्या लढ्यात महिला सक्षमपणे पुढाकार घेतील, असे सांगितले. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर म्हणाले, ‘‘बांधकाम व्यवसायात मराठा समाजाने पुढे यावे.’’ निवासराव साळोखे यांनी बैठका, मेळावे यात वेळ न घालविता अंतिम लढा जाहीर करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले. दिलीप देसाई यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, असा ठराव मांडला. यावेळी विजय जाधव, दीपक जाधव, डॉ. राजेश पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. बैठकीस जयकुमार शिंदे, अनिल कदम, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, अजित राऊत, बाजीराव चव्हाण, सुंदरराव देसाई उपस्थित होते.
आता मागे हटू नये!
मराठा समाजाला मागास दाखविणारा अहवाल तयार करा, राज्य शासन ते करणार नसेल तर राज्यकर्त्यांची झोप उडवा. त्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागले तरी चालेल. मात्र, आता समाजाने मागे हटू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.