इचलकरंजी : रोजगाराच्या निमित्ताने उत्तरप्रदेशमधून आलेले सुमारे 3 हजार कामगार आज पहाटेपासून गावाकडे परतले. यासाठी प्रशासनाने येथील राजीव गांधी भवनमध्ये कामगारांना कोल्हापूर रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली होती. गावाकडची ओढ आणि तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गावाकडे जाण्यासाठी मिळालेली संधी याचा आनंद अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर होता.
शहरात यंत्रमाग व अन्य उद्योगाच्या निमित्ताने उत्तरप्रदेशमधून मोठ्या संख्येने येथे कामगार स्थायिक झाले आहेत. अनेक कामगार कुटुंबीयासहीतच अनेक वर्षे होते. मात्र दोन महिने शहरातील उद्योगच थंडावल्याने या कामगारांना उद्योग सुरू होईपर्यंत करायचे काय असाच प्रश्न पडला आहे. शहरातील तब्बल 5 हजारहून अधिक केवळ उत्तरप्रदेशातील कामगारांनी गावाकडे जाण्यासाठी अर्ज सादर केले होते. त्यानुसार काल दुपारी जिल्हा प्रशासनाने 1400 कामगारांना कोल्हापूरपर्यंत सोडण्याचा आदेश येथील प्रशासनाला दिला होता. त्याप्रमाणे राज्य महामंडळाच्या सुमारे 60 बसमधून या कामगारांना कोल्हापूर येथे पोहचवले.
दरम्यान मध्यरात्री पुन्हा जिल्हा प्रशासनाने 1500 कामगारांना आज सायंकाळपर्यंत कोल्हापूर बस स्थानकावर सोडण्यास सांगितले. त्याप्रमाणे पुन्हा आज सकाळपासूनच येथील प्रशासन कामगारांशी संपर्क साधून त्यांना येथील राजीव गांधी भवन येथे एकत्र केले. आजही लालपरीच्याच गाड्या या कामगारांना सोडण्यासाठी आल्या होत्या. आज दुपारी व सायंकाळी सुटणाऱ्या रेल्वेसाठी या कामगारांना सोडण्याचे होते.
सकाळच्या पहिल्या टप्प्यात दुपारी सुटणाऱ्या गाडीमधील प्रवाशांना कोल्हापूर, हातकणंगले येथे पोहोचवले. त्यानंतर सायंकाळी जाणाऱ्या ट्रेनमधील कामगारांना तेथे पोचवले. उपमुख्याधिकारी केतन गुजर, पालिकेचे अधिकारी संजय बागडे, सुभाष देशपांडे, संजय कांबळे, संदीप जेरे, अप्पर तहसीलदार सनदे हे याठिकाणचे नियोजन पाहत होते.
रेल्वे स्टेशनवर मेगाब्लॉक
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर विविध भागातून कामगारांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनामुळे स्टेशन रस्त्यावर मेगाब्लॉक होत होते. त्यामुळे येथील बस पुढील सूचना आल्यानंतरच सोडण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून आला होता. त्यानुसार या ठिकाणाहून बस सोडण्यात येत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.