56854
गडहिंग्लज : शिवराज विद्या संकुलात रंगनाथन यांच्या प्रतिमेच्या पूजनप्रसंगी डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस. एम. कदम, प्रा. बिनादेवी कुराडे, प्रा. तानाजी चौगुले, संदीप कुराडे आदी उपस्थित होते.
वाचनातून यशाची गुंतवणूक
डॉ. अल्ताफ नाईकवाडे : शिवराज विद्या संकुलात कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : मानवी जीवन अधिक परिपूर्ण होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे तणाव दूर होतो आणि आपल्या विचारांवर नियंत्रण मिळविता येते. जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी वाचन केले पाहिजे. विद्यार्थी दशेतील वाचन म्हणजे यशाची गुंतवणूक असते, असे प्रतिपादन डॉ. अल्ताफ नाईकवाडे यांनी केले.
येथील शिवराज विद्या संकुलात ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त एकदिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन झाले.
डॉ. नाईकवाडे म्हणाले, ‘‘आनंद साधनेचे मूळ तत्त्व हे वाचन आहे. जगातील महान व्यक्तिमत्त्वांनी वाचनातून आपले जीवन समृद्ध केले आहे. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.’’
डॉ. कुराडे म्हणाले, ‘‘ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाश्वत ज्ञान मिळते. विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे. पुस्तकांशिवाय पर्याय नाही. स्फूर्ती देणारा इतिहास व भूगोल हा ग्रंथांमधून खऱ्याअर्थी मिळत असतो. आठवड्यातून एकतरी पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे.’’ डॉ. कदम यांचेही भाषण झाले. संस्थेच्या संचालिका व नगरसेविका प्रा. बिनादेवी कुराडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. विद्या पाटील यांनी केले. उपप्राचार्य प्रा. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.