सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज एका उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे नऊ उमेदवार रिंगणात राहिले असून, या उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उदयनराजे भोसले व भाजप-शिवसेना महायुतीचे नरेंद्र पाटील यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. 23 एप्रिलला मतदान होईल. अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांनी अर्ज माघारी घेतला. ते माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस आहेत. नरेंद्र पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात आता नऊ उमेदवार राहिले आहेत. तरीही, खरी लढत उदयनराजे व नरेंद्र पाटील यांच्यातच होईल. मागील लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून 18 उमेदवार रिंगणात होते. निवडणूक लढविणारे उमेदवार राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडी - उदयनराजे भोसले भाजप-शिवसेना महायुती - नरेंद्र पाटील बहुजन समाज पक्ष - आनंदा थोरवडे वंचित बहुजन आघाडी - सहदेव ऐवळे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष - दिलीप जगताप अपक्ष - शैलेंद्र वीर, पंजाबराव पाटील, सागर भिसे, अभिजित बिचुकले. पक्षाचे अधिकृत उमेदवार व इतर उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. त्यामध्ये आनंद थोरवडे - हत्ती, उदयनराजे भोसले - घड्याळ, नरेंद्र पाटील - धनुष्य-बाण, दिलीप जगताप - वातानुकूलन यंत्र, सहदेव ऐवळे - कप-बशी, अपक्ष - अभिजित बिचुकले - दूरदर्शन संच, पंजाबराव पाटील - जेवणाचे ताट, शैलेंद्र वीर - चालण्याची काठी, सागर भिसे - शिट्टी. सह्याद्री कदमांचा रणजितसिहांना पाठिंबा माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा अर्ज असतानाच फलटणचे भाजपचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम यांनी नाराज होऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर सह्याद्री कदम यांनी अर्ज मागे घेत रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पाठिंबा जाहीर केला. या मतदारसंघातून तब्बल 31 उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे संजय शिंदे व भाजप-सेना महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच होईल. |