सोलापूर : आपण सारे आता शहरी झालो आहोत. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या भागात अतिक्रमण वाढत आहे. वन्यजीवांकडून हल्ले होत आहेत म्हणून आपल्याला प्राणीच नकोत असे म्हणून कसे चालेल? पूर्वी लोक प्राण्यांच्या सहवासात राहायचे. फक्त माणूसच जगला पाहिजे ही भूमिका चुकीची आहे, असे सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने उपवनसंरक्षक श्री. माळी यांच्याशी 'सकाळ'ने संवाद साधला. अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात बिबट्या दिसल्याने गोंधळ उडाला होता. बिबट्या हा माणसांवर हल्ला करीत नाही. तो मांजरासारखा प्राणी आहे. उंदीर, घुशी, ससे आणि बकरी हे त्याचे खाद्य आहे. तो फक्त पोटातील आतडे खातो. मांस खात नाही, असे श्री. माळी म्हणाले.
काही ठिकाणी मांडूळ तस्करीच्या घटना घडतात. मांडूळ बाळगल्याने कोणत्याही प्रकारचा धनलाभ होत नाही. वन्यजीव कायद्यांतर्गत मांडूळ बाळगणाऱ्या, मांडूळाची तस्करी करणाऱ्यावर कारवाई केली जाते. वन्यजीव आणि माणसांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने वन विभागाकडून 1926 ही हेल्पलाइन कार्यरत आहे. त्यावर संपर्क साधल्यानंतर मदत केली जाते. सोलापूर परिसरात काळवीट, ससे, रानडुकरे यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. करमाळा परिसरात दिसलेला बिबट्या पहिल्यांदाच आढळून आला होता. आता त्या परिसरात बिबट्याचे अस्तित्व नसल्याने घाबरण्याचे कारण नाही.
अनेकदा अभयारण्यात, जंगलात फिरून वन्यजीवांची स्थिती काय आहे हे पाहणे अवघड होते. त्यामुळे आता आम्ही ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून परिसराचे निरीक्षण करतो. सिद्धेश्वर वन विहारांमध्ये घुसणाऱ्या डुकरांना हुसकावून लावण्यासाठीही आम्ही या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. वन्यजीवांसोबत माणसांच्या सुरक्षेसाठी वन विभाग कार्यरत आहे.
- संजय माळी, उपवनसंरक्षक, वन विभाग, सोलापूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.