बेळगाव : दरवर्षी आषाढी एकादशी जवळ येताच शहर आणि सीमाभागातील वारकऱ्यांसह भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागते. यावेळी मात्र सीमाभागातील नागरिकांना पांडुरंगाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागणार आहे. तसेच यावेळी बेळगाव आणी परिसरातून निघणाऱ्या दिंड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडीत होणार आहे.
सीमाभागातून पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच दरवर्षी आषाडी एकादशीनिमित्त कंग्राळी खुर्द, हिंडलगा, येळ्ळूर, निलजी, सांबरा, एम. के. हुबळी, घटप्रभा आदी भागातून 20 ते 25 दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. तसेच वारकरी महासंघाच्यावतीने दरवर्षी आळंदी ते पंढरपूरपर्यंत आयोजित केल्या जाणाऱ्या वारीत कर्नाटक व गोवा राज्यातूनही वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
आळंदी व देहू येथून परंपरेप्रमाणे संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन दिंडी निघाली असली तरी यावेळी फक्त 50 जणांनाच दिंडीत सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र सीमाभागातून पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या दिंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे दरवेळी पारंपरिक पद्घतीने आयोजित केल्या जाणाऱ्या दिंड्या रद्द केल्याची माहिती दिंडी चालकांकडुन देण्यात येत आहे.
अनलॉक एकमध्ये विविध प्रकारची सवलत देऊन अनेक मंदिर सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत आहेत. मात्र क्वारंटाईनच्या नियमामुळे बेळगाव व सीमाभागातील नागरिकांना यात्रा काळात पंढरपुरला जाता येणार नाही. त्यामुळे यावेळी आषाडी एकादशीला घरातुनच पांडुरंगाचा धावा करावा लागणार आहे
वारकऱ्यांनी घरातूनच पूजा
कोरोनामुळे यावेळी पहिल्यांदाच सीमाभागातील दिंड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे नाराजी आहे. कोरोनामुळे यावेळी वारकऱ्यांनी घरातूनच पूजा करावी.
शंकर बाबली, अध्यक्ष बेळगाव जिल्हा वारकरी भाविक सेवा संघ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.