सांगली- साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिने उलटले असून आतापर्यंत सहकारी नऊ आणि खासगी तीन अशा 12 कारखान्यांनी 41 लाख 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. तर 49 लाख 2 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. आणखी महिनाभर गळीत हंगाम सुरू राहील असे जिल्ह्यातील चित्र आहे.
जिल्ह्यात यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पाऊस यामुळे ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. 30 टक्के ऊस उत्पादन घटले आहे. अवकाळी पावसामुळे यंदा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. त्यामुळे यंदा जेमतेम तीन ते साडे तीन महिने हंगाम सुरू राहील असा अंदाज वर्तवला गेला. ऊस क्षेत्र कमी असल्यामुळे अधिकाधिक गाळप करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात कारखान्यांची स्पर्धा रंगेल असे चित्र आहे.
हंगाम सुरू होऊन अडीच महिन्याचा काळ झाला आहे. जिल्ह्यात यंदा सहकारी क्षेत्रातील नऊ आणि खासगी तीन अशा 12 कारखान्यांचाच हंगाम सुरू राहिला आहे. सहकारी कारखान्यांपैकी माणगंगा, महांकाली, तासगाव आणि जतमधील डफळे कारखान्यांचा हंगाम सुरू झाला नाही. तसेच खासगी मधील यशवंत आणि केन ऍग्रो हे कारखाने यंदा बंदच आहेत.
अडीच महिन्यात 12 कारखान्यांनी 41 लाख 19 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 49 लाख 2 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर सरासरी साखर उतारा 11.9 टक्के इतका मिळाला आहे. कारखान्यांचा हंगाम आणखी महिनाभर सुरू राहील असे चित्र आहे. यंदा ऊस क्षेत्र घटल्यामुळे साखर उत्पादनाचा निचांक गाठला जाईल अशी परिस्थिती आहे.
ऊस गाळपात राजारामबापू कारखाना साखराळे, सोनहिरा, वसंतदादा-दत्त इंडिया, क्रांती सहकारी, विश्वास सहकारी कारखाना हे अनुक्रमे आघाडीवर आहेत. साखर उताऱ्यामध्ये निनाईदेवी-दालमिया कारखान्याने सर्वाधिक 12.64 टक्के उतारा मिळवला आहे. त्यानंतर राजारामबापू साखराळे कारखान्याने 12.56 टक्के उतारा मिळवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.