सोलापूर : ग्राहकांनी वीज वापरली नसतानाही अनेकांना भरमसाठ बिले देण्यात आली आहेत. व्यावसायिक व घरगुती बिलाचे दरही वाढविले. अशा परिस्थितीत कॉंग्रेस नेते तथा उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफी द्यायला हवी होती. जेणेकरून ते जनतेत हिरो झाले असते आणि मृत कॉंग्रेस पुन्हा जीवंत झाली असती, असे वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खोटारडेपणा आता उघड झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला आणि वीज तोडायला आलेल्यांना धरून बडवा, असा सल्ला ऍड. आंबेडकर यांनी यावेळी दिला.
ऍड. आंबेडकर म्हणाले...
कोरोना काळात व्यावसायिकांसह बहुतेक नागरिकांनी वीजेचा वापर तेवढ्या प्रमाणात केला नसतानाही त्यांना बिले वाढीव देण्यात आली. वीजेच्या बिलाची रक्कम अथवा एकूण थकबाकी का वाढली, यासंदर्भात सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चेसाठी यावे, असे खुले आव्हानही ऍड. आंबेडकर यांनी यावेळी दिले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या निमित्ताने ऍड. आंबेडकर हे आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री कोणताही निर्णय स्वत:हून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना बारामतीचा अडसर असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे मंत्री दुबळे असून त्यांच्या हातात काहीच नसल्याचेही त्यांनी सांगितले. अडचणीतील जनता, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून कॉंग्रेस नेत्यांना जनतेत हिरो होण्याची संधी होती. मात्र, त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळात वीज तोडणी स्थगित केल्याचे सांगितले, मात्र आता सर्वत्र वीज तोडणी सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.