उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याच्या पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक बैठकीमध्ये पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने सावळा गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या या वादामुळे तालुक्यातील जनता मात्र विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र यावरून दिसून येते.
राज्यात सर्वात लहान तालुका अशी ओळख असलेला उत्तर सोलापूर हा तालुका. केवळ चार पंचायत समितीचे सदस्य या तालुक्यात आहेत. मात्र त्या चार सदस्यांमध्येही समन्वय नाही. त्या चौघांचा अधिकाऱ्यांशी एकोपा नाही. त्याचा नाहक फटका तालुक्यातील विकासकामांवर बसत असल्याचे कालच्या मासिक बैठकीवरून स्पष्टपणे दिसून आले.
पंचायत समितीची मासिक बैठक मंगळवारी सभापती रजनी भडकुंबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र त्या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तावर गैरहजर सदस्यांच्या सह्या कशा आल्या, या मुद्द्यावरून भडकुंबे यांनी गटविकास अधिकारी डॉ. जस्मीन शेख यांच्याकडे विचारणा केली. यावरूनच सर्व कर्मचाऱ्यांसमोरच पदाधिकारी व अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव दिसून आला. एवढेच नाही, तर चार सदस्यांमध्येही एकोपा नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे सभापतींनी बैठक तहकूब केली. यापूर्वीची बैठकही तहकूब केली होती. जर बैठका तहकूब करायच्या असतील तर लोकांनी तुम्हाला निवडूनच का दिले, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
सभापती भडकुंबे यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सभापती व बीडीओ यांच्यात जमत नाही. गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नाही. सभापती व पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये एकवाक्यता नाही, असे चित्र उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचेच पर्यवसान काल वादामध्ये झाले. त्यामुळे सर्वांत कमी सदस्य संख्या असलेल्या या तालुक्याची ओळख सध्या सुरू असलेल्या परिस्थितीमुळे वेगळीच होऊ लागल्याने तालुक्यातील लोकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सभापती भडकुंबे यांनी केलेल्या तक्रारीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कशा प्रकाराने विचार करतात, यावर पुढील बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
वादाचा होतोय विकासकामांवर परिणाम
तालुक्यातील जनतेने सत्ता परिवर्तन करत भाजपच्या हाती पंचायत समितीची सत्ता दिली होती. मात्र अडीच वर्षानंतर वेगळे चित्र झाल्याचे सगळ्या तालुक्याने पाहिले आहे. त्यातच आता पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने तालुक्याच्या विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे झालेल्या मासिक बैठकीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना आपण निवडूनच का दिले, असा सवालही तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.