पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील कोरोनाचे वाढते संकट द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. लाॅकडाऊनच्या चर्चेमुळे द्राक्षाचे दर गडगडले आहेत. 50 रुपये प्रती किलो दराने विकली जाणारी द्राक्षे आता 20 ते 25 रुपये किलो दराने विकली जात आहे. अशातच आता व्यापाऱ्यांनीही द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे काढणीस आलेली शेकडो टन द्राक्षे विक्री अभावी शेतकऱ्यांच्या शेतात पडून आहेत.
मागील वर्षी लाॅकडाऊन आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटांना सामोरे जात, द्राक्ष शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने द्राक्ष पिकवली. यावर्षी चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असतानाच पु्न्हा लाॅकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे द्राक्षाचे दर पडले आहेत. त्यातच आता व्यापाऱ्यांनीही द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय अशी अवस्था द्राक्ष शेतकऱ्यांची झाली आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. द्राक्षाची विक्री थांबल्याने शेळवे, खेडभाळवणी, कासेगाव, वाखरी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ऐन सुगीत शिमगा साजरी करण्याची वेळ आली आहे.
शेळवे येथील प्रकाश गाजरे व विठ्ठल गाजरे यांची प्रत्येकी दोन एकर द्राक्ष बाग आहे. पारंपारिक ऊसाची शेती कमी करुन त्यांनी द्राक्ष बाग लावली आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे आठ महिने लाॅकडाऊन होते. ऐन द्राक्ष काढणी हंगामात बाजारपेठा बंद असल्याने विठ्ठल गाजरे यांचे गेल्यावर्षी दहा लाख
रुपयांचे नुकसान झाले. गेल्यावर्षी द्राक्ष बागेसाठी घेतलेले पाच लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर अजूनही त्यांच्या डोक्यावर कायम आहे.
पुन्हा नव्याने त्यांनी कर्ज काढून द्राक्ष बागेची जोपासणा करुन द्राक्ष उत्पादन घेतले. यावर्षी चांगला दर मिळेल आणि घेतलेलं कर्ज फिटेल अशी त्यांना आशा होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लाॅकडाऊन होण्याची चर्चा सुरु आहे. त्याचा परिणाम द्राक्षासह इतर फळांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. त्यातच सध्या द्राक्षाचा 50 रुपयांचा दर 20 रुपयांवर खाली आला आहे. दर पडल्याने द्राक्ष शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेळवे (ता.पंढरपूर) येथील शेतकरी प्रकाश गाजरे यांची दोन एकरातील द्राक्षे काढणीस आली आहे. परंतु व्यापारी येत नसल्याने द्राक्षाची विक्री थांबली आहे. दोन ते तीन दिवसात द्राक्ष काढणी झाली नाही तर पु्न्हा द्राक्षाचे नुकसान होईल अशी भितीही त्यांना सतावू लागली आहे. श्री. गाजरे यांनी द्राक्ष बागेसाठी पाच लाख रुपये कर्ज काढले आहे. दर पडल्याने त्यांना बागेतून नफ्या ऐवजी आता नुकसान होणार आहे हे ही दिसू लागले आहे. केंद्र सरकारने द्राक्षासाठी हमी भाव जाहीर करावा आणि द्राक्ष शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी या भागातील द्राक्ष शेतकरी समाधान गाजरे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.