मंगळवेढा (सोलापूर) : भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेले आहेत. परंतु रहाटेवाडी गावाचा कारभार ज्या कार्यालयातून चालतो ते ग्रामपंचायत कार्यालयच पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडले आहे.
उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याबरोबर माण नदीला आलेल्या पूर परिस्थितीमुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात उजनी धरण भरल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीत खते, बियाणे व नवीन लागवड करून लाखो रुपयांचा खर्च केला. परंतु आलेल्या पुराने हा खर्च पाण्यात गेला आहे. प्रशासकीय पातळीवरून बाधित गावांतील लोकांचे स्थलांतर करण्याचे काम रात्रभर चालू होते. तालुक्यात उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तांडोर, तामदर्डी, सिद्धापूर व आरळी या गावातील शेतातील उभ्या पिकांबरोबर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परिसरात असलेल्या जमिनीत पाणी साचल्यामुळे जमिनीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिकडे - तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था या परिसरात असून पुराच्या पाण्याने या परिसरामध्ये हाहा:कार माजवला आहे. सध्या धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी केले असले तरी पुराचा प्रभाव अजून तसाच आहे. नदीकाठी असलेल्या माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये पुराचे पाणी आत शिरले. रहाटेवाडीतील 22 बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी जिल्हा परिषदेत शाळेत स्थलांतरित केले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.