दक्षिण सोलापूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू होऊन दीड महिना झाला तरी पण अद्याप कोणत्याच कारखान्याने प्रतिटन उसाची एफआरपी जाहीर केली नाही, ती त्वरित चार दिवसांत जाहीर करावी; अन्यथा साखर कारखाने बंद पाडू, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
ऊस नियंत्रण कायदा सांगतो, की गाळपास ऊस गेल्यानंतर 15 दिवसाच्या आत पैसे खात्यावर एकरकमी जमा पाहिजेत; परंतु कारखान्यांच्या मनमानी कारभारामुळे व साखर आयुक्तांच्या बेजबाबदारपणामुळे ऊस उत्पादक कष्टकरी शेतकरी आयुष्यातून उठला आहे. साखर आयुक्तांनी डोळे असून आंधळ्याची व कान असून बहिऱ्याची भूमिका घेऊ नये. साखर आयुक्तांची भूमिका थोडी संशयास्पद वाटते. याबाबतीत मुख्यमंत्र्यांना भेटून चौकशी लावणार असल्याचेही पत्रकारांशी बोलताना श्री. देशमुख सांगायला विसरले नाहीत व ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली नाही त्यांना नोटिसा काढण्याची मागणी जनहित संघटनेच्या वतीने सहकारमंत्री, साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे देशमुख यांनी केली आहे.
गोकूळ कारखान्याने गेल्या वर्षीची एफआरपीची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा केली नाही व 70 कामगारांची दहा महिन्यांचा पगार व पीएफ बुडवला आहे. तसेच जय हिंद कारखान्याने संघटनेला आश्वासन देऊनसुद्धा गेल्या वर्षीचे वाढीव 411 रुपये बिल जमा केले नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गोकूळ कारखाना 18 तारखेला व जय हिंद कारखाना 21 तारखेला बंद पाडणार, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
जय हिंद आणि गोकूळ कारखान्याला उद्देशून श्री. देशमुख म्हणाले, आंदोलनात होणाऱ्या परिणामास स्वतः चेअरमन जबाबदार असतील. ज्या शेतकऱ्यांच्या उसावर तुम्ही साखर पाडता त्या शेतकऱ्याला व कामगारांना दिवाळीला व गुढी पाडव्याला एक किलो साखर दिली जात नाही. प्रत्येक वर्षी 50 किलो साखर देण्याची मागणीही जनहितने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या वेळी विकास जाधव, दया स्वामी, गुंजेगावचे सुभाष पवार, विकास पाटील, रवी पाटील, अण्णासाहेब वाघचौरे, सुनील पुजारी, धर्मराज पुजारी, कोरवलीचे सुरेश म्हमाणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.