सोलापूर : वृद्धापकाळाने पतीचे निधन... मृत्यूची माहिती परराज्यात असलेल्या मुलांना व मुलीला मिळते... ज्या मुलाच्या हातून पित्याला मुखाग्नी मिळावा, ती मुलेच अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून पत्नीनेच पतीला मुखाग्नी देण्याची वेळ येथील नाभिक समाजाच्या कुटुंबावर आली...
हेही वाचा - दिलासादायक.... सोलापुरात एकही कोरोनाबाधित नाही
साईबाबा चौक परिसरातील रहिवासी व्यंकटय्या राजमल्लू वोद्दूल (वय 75) यांचे बुधवारी (ता. 1) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना तीन मुले आहेत. पैकी बालराज व अनिल हे पत्नी व मुलांसह तेलंगणातील हैदराबाद येथे तर कृष्णा हा सिद्धीपेठ येथे कामाला आहे. मुलगी सुजाता ही करीमनगर येथे राहते. त्यांना वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाली. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना खूप प्रयत्न करूनही स्वत:च्या वडिलांच्या अंत्यविधीला व त्यांना मुखाग्नी द्यायला येता आले नाही.
हेही वाचा - कोरोनाशी मुकाबल्याचा पंढरपूर पॅटर्न
(कै.) व्यंकटय्या यांना भाऊ व पुतणेही नाहीत. अशाप्रसंगी मुलाच्या हस्ते पित्याच्या मृत्यूवेळी करावयाचे विधी करणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा नातेवाइकांमध्ये चर्चा होऊन धर्मपत्नी श्यामलव्वा वोद्दूल (वय 70) यांनी अंत्यविधीसाठीचे सर्व विधी करावेत व चितेस मुखाग्नी द्यावा, असा शेवटचा पर्याय समोर आला. गुरुवारी सकाळी मुलाने करावयाचे क्रियाकर्म पत्नीने आपल्या पतीसाठी केले. शांती चौक येथील स्मशानभूमी येथे पतीला श्रीमती श्यामलव्वा यांनी मुखाग्नी दिला. तेव्हा वातावरण गहिवरले.
--
व्हिडिओ कॉलिंगवरून
पाहिले मुलांनी अंत्यसंस्कार
पित्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नसलेली मुले बालराज, कृष्णा, अनिल, मुलगी सुजाता, सुना व नातवंडांनी (कै.) व्यंकटय्या यांच्यावरील अंतिम संस्कार मोबाईल व्हिडिओ कॉलिंगवरून थेट पाहिला. आईकडून मुखाग्नी दिल्यानंतर उपस्थित नातेवाइकांसह मुले, मुलगी, सुना व नातवंडांचेही अश्रू अनावर झाले.
--
समाजाने केली मदत
(कै.) व्यंकटय्या व श्यामलव्वा हे दोघेच सोलापुरात राहात होते. व्यंकटय्या यांच्या मृत्यूनंतर मुलांना सोलापुरात येता आले नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने परिसरातील नागरिकांनी व नाभिक समाजबांधवांनी आर्थिक मदत केली. श्रीहरी विडप यांनी कमी दरात अंत्यसंस्काराचे साहित्य उपलब्ध करून दिले.
--
वडिलांच्या "दहाव्या'लाही मुले मुकणार
वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता न आल्याने मुले उद्विग्न आहेत. दहावा धार्मिक विधी 11 एप्रिलला होणार आहे. मात्र लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असल्याने दहाव्यालाही मुलांना उपस्थित राहता येणार नाही, यामुळे सर्व नातेवाईक हळहळ व्यक्त करीत आहेत, अशी माहिती तेलुगु नाभिक समाजाचे अध्यक्ष अनिल कोंडूर यांनी दिली.
महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.