केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्यात तीन जणांचा बळी घेतल्यानंतर दोन दिवसांपासून गायब झालेला व कोणाच्याही दृष्टिक्षेपास न आलेला बिबट्या आज (बुधवारी) सकाळी 7.45 च्या दरम्यान तालुक्याच्या पश्चिम भागातील उंदरगाव व मांजरगावाच्या मध्ये शिवारात दिसल्याने आता पश्चिम भागात घबराट निर्माण झाली आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरवातीपासून करमाळा तालुक्यात त्याचे आगमन झाले. सुरवातीला त्याने रायगावजवळील शिंदे वस्तीवरील एका शेतकऱ्याचा बळी घेतला. त्यानंतर अंजनडोह येथे महिलेवर हल्ला करून तिचाही बळी घेतला तर पुढे चिखलठाण येथे ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या मुलीवर हल्ला करून तिला ठार केले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भयग्रस्त वातावरण तयार झाले होते. त्याला पकडण्यासाठी वन विभाग व पोलिस प्रशासनाने विविध प्रयत्न केले. चिखलठाण येथे तर पाच एकर ऊस जाळून त्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला; परंतु वन विभाग व पोलिस खाते व शार्प शूटरच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात बिबट्या यशस्वी झाला. पुढील दोन दिवस कोणालाही त्याचा तपास लागला नाही. परंतु, पश्चिम भागात सकाळी सकाळी त्याने दर्शन दिले आहे.
उंदरगाव येथे बुधवारी सकाळी सरपंच हनुमंत नाळे यांना बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर वन विभागाला कळविल्यानंतर संबंधित अधिकारी सकाळी आठ वाजता ऑन दि स्पॉट हजर झाले व त्यांनी तपास सुरू केला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार व त्यांना पाहिजे त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याला लपणे सोपे जात आहे. दुपारनंतर उंदरगाव येथे डॉग स्कॉड व शार्प शूटर दाखल झाले असून, सर्च ऑपरेशन पुन्हा सुरू झाले आहे.
दोन वर्षांपूर्वीही उंदरगावात बिबट्या झाला होता जेरबंद
उंदरगाव येथेच गेल्या दोन वर्षांपूर्वी (2018) बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले होते. त्या वेळीही वन विभागाने मात्र बिबट्या नाहीच, हा तरस आहे, असे ठामपणे सांगितले होते. परंतु खरोखरच बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर मात्र यावर वन विभागाने चुप्पीच साधली होती.
रायगाव, अंजनडोह, चिखलठाण व आता उंदरगाव असे करत हा नरभक्षक बिबट्याने तालुक्याचा प्रवास केला आहे. यापुढे तो कुठे जाणार? की जेरबंद होणार? की त्यास ठार मारले जाणार हा प्रश्न आहेच. बिबट्याच्या आगमनामुळे संपूर्ण तालुका भयग्रस्त झाला असून, तो दहशतीखाली वावरत आहे. "भय इथले संपत नाही' अशी अवस्था शेतकरी व नागरिकांची झाली आहे.
करमाळा तालुक्यामध्ये बिबट्याच्या भीतीने वातावरण तणावाचे झाले असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. ऊसतोडी थांबल्या आहेत. आणखी कुठे अनुचित प्रकार होण्याची वाट न पाहता वन विभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा.
- महेशकुमार कुलकर्णी,
सरपंच, मांजरगाव, तालुका उपाध्यक्ष, सरपंच संघटना
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.