solapur
solapur sakal
सोलापूर

Solapur News : सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड; मर्जीतल्यांना लवकर उपचार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या बहुतांश रुग्णांची हेळसांड होत असल्याचे खरेखुरे चित्र आहे.

मर्जीमधील तसेच वशिलेबहाद्दरवाल्यांनाच येथे सगळे उपचार लवकर मिळतात. शिवाय येथील डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, मदतनीस, स्वच्छता कामगार आदी सर्वांचीच अरेरावी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहन करावी लागते.

खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्याची कुवत नाही आणि दुसरीकडे सर्वोपचार रुग्णालयात मोफत उपचार करून घेताना ही अडचण. शिवाय अरेरावी. एकूणच तोंड दाबून बुक्यांचा मार असाच प्रकार सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्याबाबतीत असल्याचे ‘सकाळ’ने सर्वोपचार रुग्णालयात केलेल्या सर्व्हेतून आढळून आले.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये सोलापूर जिल्ह्यासह शेजारील धाराशिवसह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील रुग्ण येतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या येथे जास्त आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला स्ट्रेचरवरून वार्डमध्ये दाखल करावे लागते. त्यावेळी कर्मचारी उपलब्ध नसतात. उपलब्ध असतील तर त्यांचे हात ओले करावे लागतात. बाहेर गावातून आलेले रुग्ण दाखल केल्यानंतर नातेवाइकांची गैरसोय होते. पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता नाही. उपचारादरम्यान डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे बाहेरून विकत आणावी लागतात. औषधे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते अशा अनेक बाबी ‘सकाळ’ने केलेल्या सर्व्हेतून पुढे आल्या.

या रुग्णालयात सर्वच प्रकारच्या आजाराचे रुग्ण येतात. मात्र कर्मचारी आणि सोयी सुविधांअभावी रुग्ण आणि नातेवाईक यांची फरफट होत आहे. मोठया प्रमाणात गैरसोयीला सामोरे जात आहेत. रुग्णाची संख्या वाढल्याने एक्स रे, केस पेपर व विविध तपासण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होते. त्यातच मर्जीतल्या आणि वशिला असणाऱ्याचा उपचार लवकर मिळत होत असून गोरगरिबांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रियादेखील अनेकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

आयसीयूसह सर्वच विभागात अस्वच्छता

रुग्णालय परिसरात विविध विभागाची माहिती व्यवस्थित मिळत नसल्याने रुग्णांची व नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. वॉर्डबॉय, परिचारिका आणि शिकवू डॉक्टर कडून व्यवस्थित वागणूक मिळत नाही. ए ब्लॉक येथील आयसीयूमध्ये तसेच वॉर्डात स्वच्छता नाही. विविध आजारावरील रुग्ण आहेत. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आहेत. रुग्णांना वेळेवर आणि सगळे उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी आहेत.

स्वच्छता कामगारांवर नियंत्रण कोणाचे?

छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात मुख्यत्वे अत्यंत महत्त्वाचा विभाग असलेल्या आयसीयू विभागसह सर्वच विभागामध्ये स्वच्छता नाही. स्वच्छतेसाठी असलेले कामगार इमानेइतबारे काम न करता कशीबशी स्वच्छता करुन निघून जातात. बऱ्याचवेळा अनेक विभागात स्वच्छता होत नाही असे अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘सकाळ’ ला सांगितले.

चार महिन्यांपूर्वी प्रसूती झाली होती. मात्र, बाळाला कफ झाल्यामुळे दाखल केले आहे. काही औषधे बाहेरून आणा म्हणून सांगत आहेत. वाफेची मशिन येथे मिळत नाही, विकत आणून द्या, असे सांगतात. उपचार चांगले आहेत. मात्र, ओपीडी एकीकडे, मेडिकल दुसरीकडे, विविध तपासण्या तिसरीकडे यामुळे धावपळ मोठया प्रमाणात होते. तसेच आम्हाला माहिती व्यवस्थित दिली जात नाही.

- सोन्या बापू खांडेकर, रुग्ण नातेवाईक, कुरनूर

नुसतेच निदान...पुढच्या उपचाराचे काय?

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात विविध आजारावर निदान केले जाते. येथे तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी फौज आहे. रुग्णांची तपासणी होऊन निदान होते, मात्र, पुढील उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नुसते मोफत निदान होऊन उपयोग काय? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

तातडीच्या कक्षात बिनधास्त वाहनतळ

रुग्णालय परिसरात पार्किंगची सुविधा असतानाही बाह्यरुग्ण विभाग, तातडीचा कक्ष येथे कर्मचाऱ्यांच्या गाड्या बिनधास्तपणे पार्क केल्या जातात. तातडीच्या वेळेस या गाड्यांमुळे अडचण निर्माण होते. सुरक्षारक्षक नातेवाईकांशी अरेरावी करतात रुग्णाला भेटू देत नाहीत असे चित्र दिसून आले.

प्रसूती विभाग व बालरोग चिकित्सा विभागाच्या सुविधा चांगल्या आहेत. डॉक्टर, नर्स, आया व्यवस्थित लक्ष देतात. पण स्वच्छता नाही. प्रसूतीसाठी खूप महिला दररोज येत असतात. हा विभाग आणखी मोठा व्हावा.

- मनीषा रूपनर, रुग्ण

परगावाहून उपचारासाठी सोलापुरात काल रुग्ण आणला आहे. येथील उपचार चांगले व मोफत आहेत. मात्र, नातेवाइकांची झोपायची सोय नाही. जेवायला बसायला जागा नाही. वॉर्डामध्ये स्वच्छता नाही.

- युसूफ पठाण, रुग्ण नातेवाईक, लोहारा

गोरगरीब लोक शासनाचा दवाखाना मोफत असल्यामुळे येतात. रुग्णालय प्रशस्त आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, कर्मचारी याची कमतरता आहे. प्रसूती सुविधा चांगल्या आहेत. नातेवाईक यांच्यासाठी विश्रांतिगृह तसेच नव्या सुविधा आवश्यक आहे.त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.

- विश्वास बनसोडे, नातेवाईक, भोगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT