सोलापूरः सोलापूर शहरातील अनेक भागातील बहुतांश रस्ते जलवाहिनी व भूमिगत गटारीच्या कामासाठी खोदण्यात आले आहेत. या खोदलेल्या रस्त्यामुळे सोलापूरकर चांगलेच वैतागले आहेत. हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी सोलापुरमधील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
शहरातील दत्त चौक, रेल्वे स्टेशन परिसर, मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक, समाचार चौक, विजापूर वेस, बाराईमाम चौक, बाळीवेस, सम्राट चौक, तरटी नाका पोलीस चौकी, मंगळवार बाजार, राजेंद्र चौक, आदी परिसरातील भूमिगत गटारी आणि जलवाहिनीच्या कामामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सोलापूरमधील नागरिकांना याचा त्रास सहन करतच घर गाठावे लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या सर्व प्रश्नाकडे कधी लक्ष देणार आहे हाच संतापजनक सवाल महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सोलापूरकर विचारत आहेत.
शहरातील भूमिगत गटारी तसेच पाईपलाईन टाकण्याचे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील बहुतांश भागातील रस्ते खोदण्यात येत आहे. रस्ते खोदण्यापूर्वी आधीचे रस्ते दुरुस्ती करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची गरज असताना मनपा व स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांकडून असे कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे वरील सर्व भागातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सोलापूर शहरात चार दिवसावर सोलापूरकरांना पाणी मिळते त्यामुळे रस्ते खोदाईमुळे अनेक सार्वजनिक व घरगुती नावांची कनेक्शन सुटल्याने पाणी सुटलेल्या दिवशी रस्त्यावर पाणी होऊन माती चिखल असल्याने दुचाकी चालकांना अपघाताला सामोरे जावे लागते अनेक भागाचे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे मात्र मागील अनेक दिवसांपासून डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे.
प्रशासनाने पूर्वसूचना देऊन कामे करावी.
सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. मात्र या कामाची कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे रस्ते बंद करण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांना रस्त्यावरून ये-जा करताना त्रास होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पूर्वसूचना देऊन कामे करावी.
पंकज काळे, युवक
मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
मागील अनेक महिन्यांपासून शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. टाळेबंदीमुळे सर्वत्र शाळा, महाविद्यालय बंद होती. मात्र अनलॉकच्या टप्प्यात मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना सोडण्यासाठी व भाजीपाला घेण्यासाठी सकाळी बाजारात दुचाकीवरुन जावे लागते. शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
भाग्यश्री भोसले, गृहिणी
अपघात आणि वाहतूक कोंडी ही नित्याची
शहरातील सर्व भागातील रस्ते खोदल्याने रस्त्यावरील अपघात आणि वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. त्यामुळे दररोज अपघाताला सामोरे जावे लागते. सकाळी प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. घरी जाताना जीव मुठीत घेऊन घरी जावे लागते. मनपा प्रशासनांकडून कामे केली जात आहेत. मात्र माती, खडी आदींचा पसारा हा रस्त्याच्या कडेलाच टाकला जात आहे.
सलीम शेख, ज्येष्ठ नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.