केत्तूर (सोलापूर) : भाजीपाल्यातील टोमॅटो पिकांना बाजारात सध्या एक ते दोन रुपये अशाप्रकारे नीचांकी दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे योग्य दराअभावी शेतातच टोमॅटोचा चिखल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पोमलवाडी (ता. करमाळा) येथील युवा शेतकरी रोहित मगर यांनी दोन पैसे होतील या आशेने आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे रोगराईपासून पीक वाचण्यासाठी पिकावर सतत औषध फवारणीही केली. चांगल्या उत्पन्नाच्या आशेवर त्यांनी भला मोठा खर्च केला. झाडेही फळांनी लगडली. परंतु सध्या मार्केटमध्ये टोमॅटो एक रुपया ते दोन रुपये किलो याप्रमाणे विकला जात असल्याने टोमॅटो मार्केटला नेणेही परवडत नाही. त्यामुळे त्यांनी संपूर्ण पीक शेतात सोडून दिले आहे. त्यामुळे शेतात मात्र टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे.
गतवर्षी अशाच प्रकारची परिस्थिती पाहावयास मिळाली होती. कोरोना महामारीमुळे लॉकडाउनमध्ये वाहतूक व मार्केट बंद असल्याने शेतातील तयार पिके बाजारात विकता आली नाही. त्या वेळीही मोठा आर्थिक फटका बसला होता.
टोमॅटो पाठोपाठ कोबी पिकालाही उतरत्या दराचा सामना करावा लागत असून, कोबी पिकाने सध्या नीचांकी दर गाठला आहे. केवळ एक रुपया दराने कोबीची विक्री होत आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पिके वाचवण्यासाठी खर्च करूनही समाधानकारक दर मिळत नसल्याने पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घोंगावू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन होते की काय? याच भीतीने शेतकरी मात्र हबकून गेला आहे.
एक वेगळा प्रयोग म्हणून टोमॅटोची लागवड केली. चांगला दर मिळेल अशी आशा होती. त्यामुळे खर्चही केला. परंतु सध्या बाजारात टोमॅटोला दरच नसल्याने तो मातीमोल दराने विकावा लागत आहे. या दरात केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे टोमॅटो शेतातच सोडून दिले आहेत.
- रोहित मगर,
शेतकरी, पोमलवाडी
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.