सोलापूरः राज्य शासनाने उमेद ग्रामीण जिवनोन्नती अभियान शासकीय पातळीवर बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाने हे अभियान खासगी संस्थेकडे सोपवण्याच्या विरोधात जिल्हाभरातील महिला बचत गटाच्या वतीने सोमवारी (ता.12) शहरात मोर्चा काढला जाणार आहे.
उमेद ग्रामीण जिवनोन्नती अभियान हे वर्ष 2013 पासून सुरु झाले. गरीब व वंचित महिलांचे स्वयंसहायता समुह स्थापन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम या योजनेतून केले जाते. या माध्यमातून हजारो महिलांनी स्वतःचे उद्योग, बचत व सेवा देत मोठी आर्थिक प्रगती साधली होती. शासनाने या अभियानाची उभारणी कंत्राटी कर्मचारी नेमुन केलेली होती. मागील काही वर्षात करोडो रुपयांची गुंतवणूक महिलांनी करत सक्षमीकरणाचे ध्येय साधले आहे. शासनाची योजना असल्याने बॅंकांनी देखील मोठ्या प्रमाणात या बचत गट चळवळीला मदत केलेली होती. विशेष म्हणजे या बचतगटांनी कर्जातुन व्यवसाय उभारत प्रचंड रोजगार निर्मिती केली. तसेच कर्जफेड शंभर टक्क्यापर्यंत पोहोचवत या चळवळीत पारदर्शकता जपली आहे. अभियानाच्या माध्यमातून झालेली आर्थिक क्रांती ही शासनाच्या सामाजिक प्रगतीचा मापदंड बनलेला होता. या अभियानाने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाचे आर्थिक शोषण थांबवून खासगी सावकारीवर अकुंश बसवण्याचे काम केले.
मात्र अचानक काही दिवसापुर्वी उमेदच्या वतीने एक परिपत्रक काढून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षासाठी नियुक्ती देऊ नये असे आदेश काढले. या प्रकारामुळे राज्यभरातील साडेतीन हजार कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर आले. त्यांच्यासह त्यांची कुटुंबे उघड्यावर पडण्याची वेळ आली. शासनाने या पुर्वी एसजीएसवाय सारख्या बाहेरील संस्थांना दिल्यानंतर त्या अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. तरीही शासनाने पुन्हा उमेद अभियान बंद करण्याची तयारी करून सर्वात समाजातील शेवटच्या दुर्बल घटक असलेल्या कुंटुबांच्या आर्थिक प्रगतीचा आधार तोडण्याची तयारी चालवली आहे. योजना बंद करण्याबाबत येत्या ता.20 रोजी मंत्रीमंडळात निर्णय होणार असल्याचे सांगितले जाते. तसेच उमेदमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना खासगी कंपन्यामधून उमेद अभियानाचे काम आमच्याकडे येणार असल्याने तुम्ही आमच्याकडे सेवा द्या असे कॉल येत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
शासनाच्या या निर्णया विरोधात महिला बचतगट आता आंदोलन करणार आहेत. सोमवारी (ता.12) रोजी सोलापूर शहरात हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हाभरातील बचत गटाच्या महिला सदस्या मुक मोर्चा काढणार आहेत. राज्यभरात हे आंदोलन एकाचवेळी केले जाणार आहे.
राज्यभरात आंदोलन
राज्य शासनाने घेतलेले निर्णयाच्या विरोधात या उमेद अभियानातून आर्थिक प्रगती करणाऱ्या महिला बचत गटाचे व काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे भविष्य अंधारात सापडल्याने राज्यभरात आंदोलन सोमवारी (ता.12) केले जात आहे.
- प्रमोद चिंचोरे, अध्यक्ष, उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याण मंडळ, सोलापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.